Post views: counter

Current Affairs March Part - 1


  • जगातील सर्वांत सुंदर शहर :
डॅन्युब नदीच्या तीरावर वसलेली ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना हे जगातील सर्वांत सुंदर शहर ठरले आहे.
 तसेच या शहरातील उच्च प्रतीचे राहणीमान सर्व जगात चांगले असल्याचे एका सर्वेक्षणातून सिद्ध झाले आहे.
 मर्सर या संस्थेने हे सर्वेक्षण केले असून विविध कंपन्या, संस्था आणि नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर त्यांनी जगातील 230 शहरांचा अभ्यास केला.
 तसेच यादी तयार करताना या संस्थेने राजकीय स्थैर्य, आरोग्यसुविधा, शिक्षण, गुन्हेगारी, वाहतूक व्यवस्था असे अनेक निकष लावले.
 व्हिएन्ना शहराची लोकसंख्या 17 लाख असून, शहरात असलेली विविध संग्रहालये, रंगभूमी, ऑपेरा आणि कॅफे संस्कृतीचा आनंद हे नागरिक घेत असतात.
 इतर पाश्‍चात्य देशांतील शहरांची तुलना करता येथील सार्वजनिक वाहतूकही बरीच स्वस्त आहे.
 एकेकाळी जागतिक व्यापाराचे केंद्र असलेले बगदाद दहशतवादाने होरपळल्याने या यादीत अखेरच्या स्थानावर आहे.
  • भारतीय कलाकाराला फ्रान्सचा नाइटहूड सन्मान :
आयुष्यभर कलेचा प्रसार करत असल्याबद्दल एका भारतीय वंशाच्या कलाकाराला फ्रान्स सरकारने नाइटहूड हा किताब देऊन त्याचा सन्मान केला आहे.
 दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या इस्माईल महंमद यांचा फ्रेंच राजदूताने 'नाइट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्टस अँड लिटरेचर' हा किताब दिला.
 फ्रान्सने केलेल्या सन्मानाबद्दल इस्माईल यांनी आभार मानले असून, कलेची राजधानी समजल्या जाणाऱ्या पॅरिसनेच हा गौरव केल्याची भावना व्यक्त केली आहे.

 फ्रान्स सरकारकडून 1957 पासून हा किताब दिला जात आहे.
 कला आणि साहित्याद्वारे फ्रान्सच्या संस्कृतीचा प्रसार करणाऱ्या कलाकारांना हा किताब दिला जातो.
 अनेक सांस्कृतिक महोत्सवांचे आयोजन करत असलेल्या इस्माईल महंमद यांना आधीही अनेक पुरस्कार मिळाले आहेत, ते नाट्यलेखकही आहेत.
  • मुद्रण कलेला 975 वर्षे पूर्ण झाली :
मुद्रण कलेचे जनक योहानेस गुटेनबर्ग यांचा जन्मदिन 24 फेब्रुवारीला झाला.
 हा दिवस जागतिक मुद्रण दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात चीनमध्ये खरंतर मुद्रण पद्धतीचा शोध लागला.
 तसेच त्यानंतर आजपर्यंतच्या प्रदीर्घ कालखंडात कोणत्याही क्षेत्रात झाली नाही इतकी प्रचंड गतीने प्रगती मुद्रण कला आणि पद्धती यामध्ये झाली आहे.
 चीनमध्ये इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात मुद्रण पद्धतीत वापरल्या जाणाऱ्या उपकरणांमध्ये कागद, शाई आणि मुद्रण प्रतिमा यांचा समावेश होता.
 मुद्रण प्रतिमा कोरून तयार केलेल्या पृष्ठांची असे, बौद्ध धर्मातील काही विचार, मजकूर म्हणून संगमरवरी दगडी खांबावर कोरून ठेवलेले असत.
 जेव्हा यात्रेकरू अशा ठिकाणी जात तेव्हा या कोरलेल्या मजकुरावर विशिष्ट शाई लावून त्यावर ओलसर कागद दाबून मुद्रणाचा ठसा मिळवीत असत.
 तसेच यातूनच चीनमध्ये मुद्रण प्रतिमेद्वारे मुद्रणाचे तंत्र सापडले.
 सहाव्या शतकानंतर या संगमरवरी दगडाच्या जागी लाकूड आले. 1954 मध्ये तत्कालीन कुलाबा जिल्ह्यात एकूण 10 मुद्रणालये होती.
 1870 मध्ये अलिबागमध्ये ‘सत्यसदन’ नावाचा पहिला छापखाना सुरू झाला. त्यात शिलामुद्रण पद्धतीची कामे होत असत.
 1880 नंतर अमेरिकेत ओटमार मेर्गेन्टालर यांनी ‘लायनोटाईप’ नावाचे एक पूर्ण ओळ जुळवण्याचे यंत्र शोधून काढले.
  • पहिली आण्विक पाणबुडी सज्ज :
अणु इंधनावर चालणारी आणि अण्वस्त्रधारी अशी भारतात बांधलेली पहिली पाणबुडी ‘आयएनएस अरिहंत’ नौदलात कामगिरीसाठी सज्ज झाली आहे.
 सर्व कठोर चाचण्या ‘आयएनएस अरिहंत’ने अलीकडेच यशस्वीपणे पूर्ण केल्या असून नौदलात दाखल करण्याबाबत सरकारी पातळीवरील निर्णय होताच ती नौदल ताफ्यात सामील होईल.
 विशाखापट्टणम येथील नौदल जहाजबांधणी गोदीत ‘आयएनएस अरिहंत’ची बांधणी केली गेली व गेल्या पाच महिन्यांपासून रशियाच्या मदतीने तेथेच तिच्या खोल सागरी सफरीच्या चाचण्या सुरू होत्या.
 ‘एसएसबीएन’ या तांत्रिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या ‘अरिहंत’च्या वर्गातील एकूण पाच आण्विक पाणबुड्या बांधण्याची भारताची महत्त्वाकांक्षी योजना आहे.
 सध्या भारतीय नौदलात ‘अकुला’ वर्गातील ‘आयएनएस चक्र’ ही एकमेव आण्विक पाणबुडी कार्यरत आहे, ती रशियाकडून काही काळासाठी भाड्याने घेण्यात आली आहे.
 म्हणूनच ‘आयएनएस अरिहंत’ ही नौदलात दाखल होणारी भारतीय बनावटीची पहिली आण्विक पाणबुडी असेल.
 याच वर्गातील आणखी दोन पाणबुड्यांचे काम सध्या विशाखापट्टणम येथे सुरू आहे. या पाणबुड्या ‘अरिहंत’हून अधिक मोठ्या व अत्याधुनिक असतील.
  • सौर ऊर्जेवर चालणारी पहिली संसद :
जगामध्ये सौर ऊर्जेवर चालणारी पहिली संसद पाकिस्तानमध्ये सुरू झाली. 
 पाकिस्तानमधील संसद ही पूर्णपणे सौरऊर्जेवर चालते.
 सौरऊर्जेसाठी चीनने साडेपाच कोटी डॉलर एवढा निधी दिला आहे.
 पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या हस्ते (दि.24) सौरऊर्जेचे बटन दाबून उद्घाटन करण्यात आले.
 राजधानी इस्लामाबादमधील संसद सौरऊर्जेवर चालविणार असल्याची घोषणा सन 2014 मध्ये करण्यात आली होती.
 पाकिस्तानची संसद (दि.24) पूर्णपणे सौरऊर्जेवर चालू लागली आहे.
  • सागरी पातळीत जास्त वाढ :
गेल्या शतकभरात सागरी जलपातळी गेल्या 27 शतकांपेक्षा जास्त वेगाने वाढली असून ते प्रमाण 14 सेंटिमीटर आहे.
 जागतिक तापमानवाढीमुळे ही सागरीपातळी वाढली असून ते धोकादायक आहे, असे संशोधन अहवालात म्हटले आहे.
 सागरी जलाची पातळी इ. स. 1900 ते इ. स. 2000 या काळात 14 सेंटिमीटर किंवा 5.5 इंचांनी वाढली आहे.
 जागतिक तापमानवाढ झाली नसती तर हे प्रमाण विसाव्या शतकात सागरी जलपातळी वाढीतील प्रमाण निम्म्याहून कमी राहिले असते.
 रूटगर्सच्या पृथ्वी व ग्रहीय विज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक रॉबर्ट कॉप यांनी सांगितले की, विसाव्या शतकात सागरी जलपातळीत फार मोठी वाढ झाली आहे, ती तीन सहस्रकांपेक्षा जास्त आहे.
 गेल्या दोन दशकात सागरी जलपातळीतील वाढ सर्वाधिक नोंदली गेली आहे.
 प्रोसिडिंग ऑफ द नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेने प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटले आहे की, गेल्या अडीच वर्षांत सागरी जलपातळी मोजण्याची सांख्यिकी पद्धत तयार करण्यात आली ती हार्वर्ड विद्यापीठाचे कार्लिग हे, एरिक मॉरो व जेरी मिट्रोव्हिका यांनी विकसित केली आहे.
  • राज्याचा अर्थसंकल्प 18 मार्चला :
विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन येत्या नऊ मार्चपासून सुरू होणार असून, 18 मार्च 2016 रोजी राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात येणार असल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी (दि.23) दिली.
 विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनातील तात्पुरते कामकाज ठरविण्यासाठी (दि.23) विधानसभा व विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक विधिमंडळात झाली.
 तसेच या बैठकीत 9 मार्च ते 17 एप्रिलदरम्यान अधिवेशनाचा कालावधी निश्‍चित करण्यात आला.
सानिया-हिंगीसचा सलग 41 वा विजय :
भारताची स्टार खेळाडू सानिया मिर्झा हिने तिची साथीदार मार्टिना हिंगीस हिच्या साथीने डब्लूटीए कतार ओपनमध्ये चीनच्या यी फानशू आणि सेसेई झेंगला तीन सेटमध्ये पराभूत केले.
तसेच या सामन्यातील विजय हा या जोडीचा सलग 41 वा विजय आहे.
अग्रमानांकित सानिया आणि हिंगीसने एक तास 24 मिनिटे चाललेल्या सामन्यात 6-4, 4-6, 10-4 असा विजय मिळविला आणि स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
दोघींनी या वर्षात चार स्पर्धेत विजय मिळवला आहे, त्यासोबतच त्यांनी एकूण 13 स्पर्धांमध्ये विजय मिळवला.
दोघींनी ब्रिस्बेन, सिडनी, ऑस्ट्रेलिया ओपन, सेंट पीटस्बर्ग या स्पर्धांमध्ये विजय मिळवला होता.
  • तटरक्षक दलाचे प्रमुख राजेंद्रसिंह :
तटरक्षक दलाचे नवे महासंचालक म्हणून राजेंद्रसिंह यांची नियुक्ती (दि.24) जाहीर करण्यात आली.
परंपरेनुसार नौदल अधिकारी या दलाचे महासंचालक होतात; पण राजेंद्रसिंह यांच्या नियुक्तीमुळे प्रथमच या दलाच्या महासंचालकपदी सागरी सुरक्षा दलातील अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्तीविषयक समितीने राजेंद्रसिंह यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आणि कार्मिक व प्रशिक्षण विभागाने नियुक्तीचा आदेश जारी केला.
राजेंद्रसिंह सध्या तटरक्षक दलाचे अतिरिक्त महासंचालक आहेत.
व्हाइस ऍडमिरल एच. सी. एस. बिश्‍त यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • स्टार्ट अप कंपन्यांना कर सूट :
देशामध्ये सध्या स्टार्ट अप कंपन्यांचा जोर वाढत असून या उद्योगांना बळकटी देण्यासाठी विविध प्रकारच्या करामध्ये सूट देण्याचे नवी योजना ‘इंडस्ट्रीयल पॉलिसी अँड प्रमोशन’ने जाहीर केली आहे.
तसेच या घोषणेनुसार, ज्या कंपन्यांची कमाल वार्षिक उलाढाल 25 कोटी रुपयांपर्यंत आहे, अशा कंपन्यांना त्यांची कंपनी म्हणून नोंद झाल्यापासून पहिली पाच वर्ष करामध्ये सूट देण्यात येणार आहे.
स्टार्ट अप कंपन्यांना बळकटी देण्यासाठी ही आजवरची सर्वात मोठी घोषणा मानली आहे.
केंद्र सरकारच्या ‘इंडस्ट्रीयल पॉलिसी अँड प्रमोशन’ने स्टार्ट अप उद्योग म्हणून नेमकी कोणाची गणना होईल, त्यांचे स्वरूप आणि त्यांना करामध्ये मिळणारी सूट यासंदर्भात नेमक्या निकषांची घोषणा केली आहे.
  • रेल्वेचे अनारक्षित तिकीट तीन तासांसाठीच :
ज्या प्रवाशांनी 199 किलोमीटर वा त्याहून कमी अंतरासाठी अनारक्षित तिकीट काढले असेल, ते यापुढे तीन तासांनंतर आपोआप रद्द ठरेल, असा नियम रेल्वेने केला आहे.
हा नियम 1 मार्चपासून अमलात येणार आहे, रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी (दि.24) लोकसभेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
प्रवाशांनी अनारक्षित तिकीट काढल्यापासून तीन तासांच्या आत प्रवास सुरू करणे या नियमानुसार बंधनकारक करण्यात येणार आहे.
तिकीट काढल्यानंतर लगेच जी गाडी निघणार असेल, त्या गाडीने वा तीन तासांच्या आत संबंधित ठिकाणी पोहोचणाऱ्या गाडीने प्रवाशांनी प्रवास करावा असा त्याचा अर्थ आहे.
मात्र 199 किलोमीटरहून अधिक अंतरासाठी हा नियम लागू नसेल, असेही रेल्वे राज्यमंत्र्यांनी उत्तरात स्पष्ट केले आहे.
  • शिवरायांच्या स्मारकाचे भूमिपूजन एप्रिलमध्ये :
मुंबई अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे आंतराराष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करण्यास (दि.24) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सुकाणू समितीने मान्यता दिली.
तसेच हे कंत्राट फ्रान्सच्या आयजीस कंपनीला देण्यात आले आहे.
या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम सन 2018 पर्यंत पूर्ण करायचे असून त्याचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार असून 20 एप्रिल ते 5 मे या दरम्यानची तारीख निश्चित करण्यात येणार आहे.
  • भारत बांगलादेशात उभारणार वीज प्रकल्प :
भारत बांगलादेशमध्ये 1.6 अब्ज डॉलरचा वीज प्रकल्प उभारणार आहे.
तसेच या प्रकल्पासाठी अनेक वर्षे वाटाघाटी सुरू होत्या. त्यांना अंतिम रूप मिळाले असून सार्वजनिक क्षेत्रातील भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) 1,320 मेगावॅट क्षमतेचा वीज प्रकल्प दक्षिण बांगलादेशातील खुलना येथे उभारणार आहे.
या करारावर येत्या 28 फेब्रुवारी रोजी उभय देश स्वाक्षऱ्या करतील, असे नवी दिल्ली आणि ढाक्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
या प्रकल्पासाठी भारताची चीनसोबत अत्यंत कडवी अशी व्यावसायिक स्पर्धा होती.
चीनने नुकतेच श्रीलंकेत विकासाचे प्रकल्प सुरू करण्यात यश मिळविले असताना बांगलादेशात भारताला प्रवेश मिळाला आहे.
  • 'पीएफ'ची रक्कम 58 वर्षांनंतर :
निवृत्तीपूर्वी नोकरी सोडणाऱ्या अथवा कामावरून काढून टाकल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला जमा झालेल्या भविष्य निर्वाह निधीची (ईपीएफ) शंभर टक्के रक्कम काढण्याचा असलेला अधिकार संपुष्टात आला आहे.
 मध्येच नोकरी सोडल्यास वयाची 58 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच ही रक्कम त्या कर्मचाऱ्यांना काढता येणार आहे, परंतु रक्कम हवी असल्यास ती संपूर्ण न मिळता कर्मचाऱ्यांना त्यांच्या हिश्‍श्‍याची (म्हणजे एकूण जमा रकमेच्या पन्नास टक्केच) रक्कम येथून पुढे मिळणार आहे.
 केंद्र सरकारकडून कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या 1952 च्या कायद्यातील तरतुदींमध्ये हा बदल करण्यात आला आहे.
 देशभरात हा बदल (दि.25) लागू करण्यात आला आहे, त्यामुळे देशातील सुमारे 11 कोटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे काढण्यावर मर्यादा येणार आहे.
 शासकीय, निमशासकीय अथवा खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा 12 टक्के 'पीएफ' रक्कम कापून घेतली जाते.
 तसेच तेवढीच रक्कम कंपनीकडून संबंधित कर्मचाऱ्याच्या 'पीएफ' खात्यात जमा केली जाते.
  • एम. वेंकय्या नायडू समिती जाट आरक्षणासाठी :
जाट आरक्षणाबाबत लवकरात लवकर तोडगा सूचविण्यासाठी संसदीय कार्यमंत्री एम. वेंकय्या नायडू यांच्या नेतृत्वातील उच्चस्तरीय समिती तयार करण्यात आली असून, या समितीला सर्वंकष अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आले आहेत.
 राजनाथसिंग यांनी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज आणि मनोहर पर्रीकर यांच्यासोबतच्या उच्चस्तरीय बैठकीत हरियाणातील जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले.
 गृहमंत्री राजनाथसिंग यांच्यासोबतच्या उच्चस्तरीय बैठकीला जाट नेते, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, लष्कर प्रमुख आणि दिल्लीचे पोलीस आयुक्त हे उपस्थित होते.
  • मुंबईचा 41 व्यांदा रणजी चषकावर विजय :
शार्दूल ठाकूर (3 व 5 बळी), धवल कुलकर्णी (5 व 2 बळी) यांची भेदक गोलंदाजी, श्रेयस अय्यरची शानदार शतकी खेळी व सिद्धांत ठाकूरच्या उपयुक्त फलंदाजीच्या बळावर मुंबईने सौराष्ट्राला 1 डाव व 21 धावांनी नमवित 41 व्यांदा रणजी चषकावर मोहर उमटविली.
 महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील मैदानावर हा सामना झाला.
 सौराष्ट्राने पहिल्या डावात केलेल्या 235 धावांना प्रत्युत्तर देताना मुंबईने पहिल्या डावात 371 धावांची खेळी केली.
 पहिल्या डावात 136 धावांची आघाडी घेतल्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी सौराष्ट्राचा दुसरा डाव 115 धावांत गुंडाळत एक डाव 21 धावांनी शानदार विजय मिळविला.
  • कालिखो पुल सरकारचा विश्वास ठराव :
अरुणाचल प्रदेश विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवनियुक्त मुख्यमंत्री कालिखो पुल यांनी कुठल्याही विरोधाशिवाय विश्वासदर्शक ठराव जिंकला.
 60 सदस्यांच्या सभागृहातील 40 आमदारांनी एकमताने ठराव मंजूर केला.
 स्वत: मुख्यमंत्री पुल यांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडल्यानंतर सभागृहात उपस्थित असलेल्या पुल यांच्यासह 40 आमदारांनी हात उंचावून या ठरावाला पाठिंबा दिला.
 40 आमदारांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला असून, विरोधात एकही मत न पडल्यामुळे हा प्रस्ताव संमत झाल्याचे अध्यक्षांनी उपस्थित असलेल्या सदस्यांच्या टाळ्यांच्या कडकडाटात जाहीर केले.
 तसेच गेल्या वर्षी 16 व 17 डिसेंबरला झालेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात तत्कालीन मुख्यमंत्री नबाम तुकी यांना त्यांच्या अनुपस्थितीत पदच्युत करण्यात आल्यानंतर सुरू झालेल्या वादाच्या मालिकेतच पुल यांची 19 फेब्रुवारीला मुख्यमंत्रिपदी नेमणूक करण्यात आली होती.
  • पाकिस्तानकचे नवीन लष्कर पथक :
पठाणकोट येथे लष्कर ए तोयबाने केलेल्या हल्ल्याच्या चौकशीसाठी पाकिस्तानचे पथक लवकरच भारतात येत आहे, तसेच पुरावे गोळा करण्याचे काम हे पथक करणार आहे.
 पाकिस्तानने या प्रकरणी नवीन पथक नेमले असून त्यात अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक महंमद ताहीर, पोलिस उपमहासंचालक महंमद अझीम अर्शद, आयएसआयचे तन्वीर अहमद, लष्करी गुप्तचर खात्याचे लेफ्टनंट कर्नल इरफान मिर्झा, तपास अधिकारी शाहीद तन्वीर यांचा समावेश आहे.
 पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते नफीस झकारिया यांनी सांगितले की, विशेष चौकशी पथक पठाणकोट येथील हवाई तळाला भेट देणार आहे.
 विशेष चौकशी पथकात नागरी, लष्करी गुप्तचर संस्थांचे तज्ञ असतील व हे चौकशी पथक पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी जानेवारीतील या हल्ल्याच्या चौकशीसाठी स्थापन केले आहे.
 अंतर्गत सुरक्षा मंत्री चौधरी निसार अली खान यांनी सांगितले की, पुरावे गोळा करण्यासाठी येणाऱ्या पाकिस्तानच्या चौकशी पथकाला भारताने परवानगी दिली आहे.
 पाकिस्तानने या प्रकरणी प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला असून त्यामुळे हल्ल्यात जे सामील असतील त्यांच्यावर खटला चालवण्याचा मार्ग सुकर होणार आहे.
  • अमेरिकन सिनेटरने हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज्मध्ये ‘संयुक्त ठराव’ :
पाकिस्तानला आठ एफ-16 लढाऊ विमानांसह शस्त्रास्त्रे विकण्याच्या कराराला काँग्रेसची नापसंती असल्याचे दाखविण्यासाठी वरिष्ठ अमेरिकन सिनेटरने हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज्मध्ये ‘संयुक्त ठराव’ मांडला आहे.
 अमेरिकेकडून मिळणाऱ्या शस्त्रांचा वापर पाकिस्तान आपल्याच नागरिकांना (विशेषत:
बलुचिस्तानमधील) दडपण्यासाठी वापरत आहे, असे डॅना रोहराबाचेर यांनी (दि.25) वरील ठराव मांडताना म्हटले.
 भारतात लोकसभा हे जसे कनिष्ठ लोकप्रतिनिधीगृह आहे तसेच हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आहे.
 तसेच या महिन्यात बराक ओबामा प्रशासनाने पाकिस्तानला 700 दशलक्ष अमेरिकन डॉलरची शस्त्रास्त्रे विकण्याचा करार अधिकृतपणे जाहीर केला होता.
  • फिफाच्या अध्यक्षपदी गियानी इन्फॅन्टिनो :
जागतिक फुटबॉल संस्था (फिफा)च्या अध्यक्षपदाच्या शर्यतील युरोपचे गियानी इन्फॅन्टिनो हे निवडून आले आहे.
 फिफा अध्यक्षपदाच्या निवडणूकीत गिलानी इन्फॅन्टिनो यांच्यासह पाच जणांमध्ये ही लढत होती.
 मात्र फिफा अध्यक्षपदाच्या निवडणूकीत खरी लढत युएफाचे सरचिटणीस गिलानी इन्फॅन्टिनो आणि आशियाई फूटबॉल संघाचे नेते शेख सलमान यांच्यात होती.
 अखेर यामध्ये गिलानी इन्फॅन्टिनो यांनाच बहुमत मिळाल्याने फिफाच्या अध्यक्षपदी त्यांचीच निवड करण्यात आली.
 फिफा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यात गिलानी इन्फॅन्टिनो यांना 207 पैकी 115 मते मिऴाली.
 आशियाई फूटबॉल संघाचे नेते शेख सलमान यांनी 88 मते मिऴाली.  
  • एच-1 बी व्हिसावर सिनेटर्सचे टीकास्त्र :
लोकप्रिय असलेल्या एच-1 बी व्हिसा कार्यक्रमावर वरिष्ठ अमेरिकी सिनेटर्सनी टीका केली आहे.
 अमेरिकी कर्मचाऱ्यांना काढून भारतासह अन्य देशांचे कर्मचारी कमी वेतनात ठेवण्यासाठी या व्हिसाचा दुरुपयोग करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
 तसेच यासंदर्भातील समितीचे प्रमुख सिनेटर जेफ सेशन्स म्हणाले की, अमेरिकेत कुशल कामगारांची टंचाई आहे, ही खेदाची बाब आहे.
 अमेरिकेत अमेरिकी कर्मचाऱ्यांना कमी करून त्यांच्या जागेवर परदेशातील कर्मचारी ठेवले जात आहेत, ही धक्कादायक बाब आहे.
 अमेरिकेत कुशल कर्मचाऱ्यांची वानवा असल्याचा आरोप अनेक कंपन्या करीत असतात.
  • मॅरेथॉनमध्ये महाराष्ट्रच्या राऊत भगिनी हे प्रथम :
महाराष्ट्राच्या रोहिणी व मोनिका राऊत भगिनींनी (दि.28) झालेल्या दिल्ली पूर्ण मॅरेथॉनमध्ये अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक जिंकून निर्विवाद वर्चस्व राखले.
तसेच पुरुष गटात पश्चिम रेल्वेच्या संतोष कुमारने विजेतेपद जिंकले.
महिलांच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये महाराष्ट्रच्या राऊत भगिनींनी कमाल दाखवली.
रोहिणी राऊत हिने दोन तास 50 मिनिटे 45 सेकंदांत मॅरेथॉन पूर्ण करून विजेतेपद जिंकले.
मोनिकाने दोन तास 55 मिनिटे48 सेकंदांची वेळ नोंदवत दुसरे स्थान मिळवले.
ज्योती गवतेला (2 तास 57 मि. 16 सेकंद) तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले\
पुरुषांच्या गटात संतोष याने दोन तास 20 मिनिट 51 सेकंदांची वेळ नोंदवली. सैन्यदलाच्या सुजित लुवांग याने दोन सात 21 मिनिट पाच सेकंदांत ही स्पर्धा पूर्ण केली.
सैन्यदलाच्याच राहुल पाल याने दोन तास 21 मिनिटे 46 सेकंदांची वेळ नोंदवत तिसरे स्थान मिळवले.  हाफ मॅरेथॉनमध्ये पुरुषांच्या गटात राकेश कुमार याने एक तास आठ मिनिट 22 सेकंदांची वेळ नोंदवत पहिले स्थान पटकावले.
सत्येंद्र सिंह याने दुसरे आणि प्रदीप सिंह याने तिसरे स्थान पटकावले.
महिलांमध्ये किरण सहदेव हिने एक तास 19 मिनिटे 54 सेकंदांची वेळ नोंदवत हाफ मॅरेथॉनचे विजेतेपद पटकावले, तर मंजू यादव आणि मोनिका चौधरी या अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा