Post views: counter

वेळेचे व्यवस्थापन


                              स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना विद्यार्थांची मोठी तक्रार असते ती वेळेच्या अभावाची. 'खूप काही करायचे होते, पण वेळच पुरला नाही', अशी ती भावना असते. त्यामुळे वेळेच्या व्यवस्थापनेचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. 
काळ आणि वेळ 
प्रत्येकाकडे वेळेचा एक विशिष्ट कोटा असतो. त्याचा योग्य वापर करता येणे हे एक 'वेळ कौशल्य' (time skill)आहे. आइनस्टाईनने सापेक्षता सिद्धांत मांडला होता. त्यानुसार वेळ ही एक सापेक्ष कल्पना आहे. वेळेचा सदुपयोग कसा होणार ते योग्य व्यूहरचना, अभ्यास कौशल्ये, इच्छाशक्ती व आरोग्य या सर्वांवर अवलंबून आहे. काळ म्हणजे तुमचे अभ्यासाचे वय व तुमच्यापुढील उपलब्ध संधी, तर वेळ म्हणजे तो काळ वापरून घ्यायची संधी. काळ तर आला आहे, वेळ चुकवून चालणार नाही. 



वेळेचे भावचक्र 
कधी प्रसन्न वाटते तर कधी निराश. कधी विचारांनी मन गजबजून जाते तर कधी मन निर्विकार होते. कधी वेळ कसा निघून गेला हे कळत नाही तर कधी वेळ जाता जात नाही. वेळेचे हे भावचक्र असे खाली वर होत असते. वेळ चुकली तर काय होते याचे उदाहरण म्हणजे नेपोलिअन. तो पाच मिनिटे रणांगणात उशिरा पोहोचला आणि घात झाला. त्याने पुढे कारावासातून लिहिले आहे, की वेळ वाया घालवला आणि वेळेने मला दगा दिला. 

स्पर्धा परीक्षा या स्थूलरूपाने (संपूर्ण परीक्षेचे व्यवस्थापन) व सूक्ष्म रूपाने (परीक्षेच्या कालावधीचे व्यवस्थापन) या दोन्ही प्रकारे वेळेच्या व्यवस्थापनाचा खेळ आहे. 

रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग 
आठवड्यातील सहा दिवसांचेच वेळापत्रक करा. एक दिवस मोकळा ठेवा. अभ्यासाचे वेळापत्रक चुकत गेले असेल तर या दिवसात ते ट्रॅकवर आणता येईल. पूर्ण वर्षाचे, महिन्याचे व आठवड्याचे असे वेळापत्रक बनवून त्यानुसार अंमलबजावणी करता आली तर उत्तम. वेळापत्रक आवाक्यातील असावे. कोणाकडूनही रेडीमेड वेळापत्रक बनवून घेऊ नका. आपल्या अभ्यासानुसार आपले वेळापत्रक बनवा. प्रत्येक अभ्यासघटकाला समान वेळ देणे भोंगळपणा ठरेल. एखाद्या घटकाला जास्त वेळ लागू शकतो, दुसरा एखादा घटक लवकर पूर्ण होऊ शकेल. 

वेळेचे सूक्ष्म नियोजन 
साधारणपणे एक तास सलग अभ्यास करणे फायदेशीर असते. त्यानंतर मात्र छोटा ब्रेक घेणे चांगले. थोडे फिरून आले किंवा दैनंदिन जीवन, निसर्ग यांचे निरीक्षण केले तर ताजेतवाने वाटते. स्वतःबरोबर थोड्या नोट्स घेऊन नेहमी फिरावे. म्हणजे रिकामा वेळ मिळाला तर त्याचा वापर करून घेता येतो. प्रवासात अभ्यास करून यश मिळवणाऱ्या उमेदवारांची मोठी यादी देता येईल. ते प्रवास त्यांना यशाकडे घेऊन गेले. आरिफ शेख हा विद्यार्थी (आता IPS) दोन तासिकांमधील जी काही पाच-दहा मिनिटे मिळतात, त्यातही काहीना काही वाचून काढे. श्रीकर परदेशी तयारी करीत असताना ते बाथरूममध्ये असतानाही घरचे त्यांना बाहेरून अभ्यासाची पाने वाचून दाखवीत. अशाप्रकारे प्रत्येक यशस्वी उमेदवाराने काहीना काही वेगळेपण दाखवले आहे. 

वेळ कसा वाया जातो? 
  1. मोबाइलला रेंज नसल्यास दर दोन मिनिटांनी तो बघत बसणे. (हे सारखे मोबाइल बघण्याचे प्रकरण आता काहींच्या बाबतीत मानसिक विकार या पातळीवर पोहचले आहे.) २) मित्र मैत्रिणींना एखादा विषय शिकवित राहणे. (मी सगळ्यांना बरोबर घेऊन जाईन ही भावना) 
  2. नातेवाईकांचे सण, समारंभ साजरे करणे. (आता IPS म्हणून काम करणारे रवींद्र शिसवे हे अभ्यास करताना घरचे लोक त्यांच्या खोलीला बाहेरून कुलूप लावून घेत. म्हणजे मग कोणी आले-गेले तरी फरक पडत नसे.) 
  3. सार्वजनिक कामांमध्ये, सणांमध्ये सक्रिय सहभाग घेणे. 
  4. सर्व यशस्वी उमेदवार/अधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्याशी बराच वेळ गप्पा मारणे. 
  5. नको असलेली पुस्तके, नोटस यांच्या फोटोप्रती काढून आणणे. 

झोपी गेलेला जागा झाला 
काहीजण वेळापत्रकाचे उल्लंघन झाल्यास झोपेचे तास कमी करून ती वेळ भरून काढायचा प्रयत्न करतात. हे बरे नव्हे. झोपेच्या वेळेवर अतिक्रमण नको. आपल्या मनाचा CPU आपण झोपेत असताना कार्यरत असतो. दिवसभरात केलेल्या अभ्यासाचे तो आपण गाढ झोपेत असताना व्यवस्थापन करतो. तेव्हा या प्रकियेला पुरेसा वेळ दिलाच पाहिजे. झोप अपुरी झाली तर अन्नाचे पचनही नीट होत नाही. त्यातून शरीराचे नैसर्गिक चक्र बिघडू शकते. त्यामुळे रात्री फक्त चार ते पाच तास झोपून उर्वरित वेळ अभ्यास करणारे या गैरसमजात असतात की ते इतरांना मागे टाकत आहेत. पण, यात नुकसानच जास्त आहे, फायदा कमी. 

दुपारी वामकुक्षी घेणे हा एक शवासनासारखाच प्रकार आहे. ज्यात मन व शरीर यांना कमी वेळात विश्रांती मिळते. वामकुक्षी घेणाऱ्यांची उर्जा इतरांपेक्षा जास्त दिसून आली आहे. मात्र, झोप व वामकुक्षी यात फरक आहे. वामकुक्षी म्हणजे झोप नव्हे. दुपारची झोप टाळलेली बरी. एकतर परीक्षा दुपारीच असतात. शिवाय दुपारच्या झोपेने डोके व शरीर जड होते. अंगात आळस मुरतो. त्यानंतर रात्री जबरदस्ती जागावे लागते. त्यापेक्षा दुपारची झोप टाळलेलीच बरी. 

- भूषण देशमुख 
(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत)

Source: www.mtonline.in

1 टिप्पणी: