Post views: counter

गोदावरी नदी

गोदावरी नदी 




  • उगम- त्र्यंबकेश्वर १,६२० मी.
  • मुख- काकिनाडा (बंगालचा उपसागर )
  • लांबी- १,४६५ कि.मी.
  • देश- महाराष्ट्र, कर्नाटक , आंध्रप्रदेश ,मध्य प्रदेश, ओरिसा
  • उपनद्या- इंद्रावती , मंजिरा, बिंदुसरा
  • सरासरी प्रवाह- ३,५०५ मी³ /से
  • पाणलोट क्षेत्र- ३,१९,८१० किमी²
  • धरण- गंगापूर (नाशिक ), नांदूर मधमेश्वर ( नाशिक ), डौलेश्वरम



गोदावरी नदीची गणना भारतातील प्रमुख नद्यांमध्ये केली जाते. गोदावरी नदीची लांबी १,४५० किलोमीटर (९०० मैल) आहे. गोदावरीचा उगम नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात होतो. साधारणत: आग्नेय दिशेला वाहून गोदावरी राजमहेंद्रीजवळ बंगालच्या

उपसागरास आंध्रप्रदेशात मिळते. भीमा वैनगंगा , इ. उपनद्या असलेल्या गोदावरीचे राजमहेंद्रीपासून १० किमी अंतरावर व समुद्रापासून ८० किमी आधी समुद्रास मिळण्यापूर्वी दोन उपवाहिन्यांमध्ये विभाजन होते. त्यांना गौतमी नदी आणि वसिष्ठा नदी असे म्हणतात.

गोदावरीतील पाणी ऋतूप्रमाणे कमी-अधिक असते. नदीतून वाहणाऱ्या पाण्यापैकी ८०% पाणी जुलै-
ऑक्टोबर या चार महिन्यांतच वाहून जाते. नदीच्या प्रवाहाची रुंदी काही ठिकाणी २०० मीटर (पूर्व घाट पार करताना) तर काही ठिकाणी ६.५ कि.मी. (समुद्रास मिळण्याआधी) इतकी होते. आपल्या पाण्यामुळे गोदावरीस महाराष्ट्र व आंध्र प्रदेश राज्यांची जीवनवाहिनी समजतात.

ऐतिहासिक, धार्मिक, आख्यायिका

यक्ष,त्र्यंबकेश्वर प्रवरेकाठी पाषाण युगापासून गोदावरी खोऱ्यात मानवी वस्ती असावी व हडप्पा संस्कृतीला समकालीन अश्या संस्कृतीचा उगम या खोऱ्यात झाला असावा, असे दैमाबाद येथे झालेल्या उत्खननांनंतर इतिहासतज्ज्ञांचे मत झाले.

रामायण काळात प्रभू रामचंद्रांनी वनवासकाळात गोदावरी तटावर आश्रम बांधला होता असे समजतात. अर्थात गोदावरीच्या संपूर्ण प्रवाह क्षेत्रात ते ठिकाण नेमके कोणते, याचा काही पुरावा उपलब्ध नाही. नदीकाठची अनेक गावे सारखाच वारसा सांगतात. एका आख्यायिकेत गौतम ऋषींच्या हातून चुकीने घडलेल्या गोवधाचे प्रायश्चित्त म्हणून, शंकराच्या इच्छेने अवतरलेल्या गंगेत स्नान करून ऋषींनी पाप धुतले अशी कथा आहे. आणि ही अवतरलेली गंगा म्हणजेच गोदावरी असा समज आहे. ही आख्यायिका नदी अवतरण्यापूर्वी पडलेल्या २४ वर्षांच्या दुष्काळाचे वर्णन करते. त्र्यंबकेश्वराजवळ कुशावर्त, ब्रह्मगिरी व गंगाद्वार ही पवित्र स्थाने आहेत. अहिल्या, गंगा, वैतरणा या उपनद्या ब्रह्मगिरीवर उगम पावतात व त्र्यंबकेश्वर येथे(?) गोदावरीस मिळतात. ऐतिहासिक काळात पैठण व राजमहेंद्री येथे विविध राजवटींनी प्रदीर्घ भरभराटीचा काळ पाहिला. नजीकच्या स्वातंत्र्यपूर्व इतिहासात गोदावरी खोऱ्यात मुख्यत्वे मोगल व निजामाची राजवट होती. स्वातंत्र्योत्तर काळात निजामाने स्वतंत्र भारतात संलग्न न होता आपले वेगळे राष्ट्र निर्मिण्याचा किंवा पाकिस्तानमध्ये विलीन होण्याचा घाट घातला होता. परंतु कॉँग्रेस व आर्य समाजाच्या स्वातंत्र्यसैनिकांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली हैदराबाद मुक्तिसंग्राम नेटाने चालवला. भारत सरकारने सरदार वल्लभभाई पटेलांद्वारे केलेल्या पोलीस कारवाईनंतर हा भाग स्वतंत्र भारताशी संलग्न झाला.

महत्त्वपूर्ण शहरे, मानवी वस्ती, संस्कृती-

गोदावरी खोऱ्यातील लोक मराठी आणि तेलुगू भाषिक आहेत. निजाम काळात उर्दू भाषेचा वापर शासकीय कामकाजात केला जात असे. भात हे तेलुगू लोकांचे मुख्य अन्न आहे तर ज्वारी हे मराठी लोकांचे मुख्य अन्न आहे. रेल्वे हा या संपूर्ण भागाला जोडणारा प्रमुख दळणवळणाचा मार्ग आहे. गोदावरीचे उगमस्थान महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर येथे असून येथील कुशावर्त घाटावर कुंभमेळा भरतो व लाखो भाविक स्नान करतात. त्र्यंबकेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. त्र्यंबकेश्वरापासून जवळ असलेले नाशिक औद्योगिक शहर आहे. कोपरगाव तालुक्याचे शहर, जायकवाडी सिंचन प्रकल्प अशियातील सर्वांत मोठा मातीचा बंधारा आहे. पैठण हे धार्मिक महत्त्वाचे स्थान असून येथे जायकवाडी धरणाच्या पार्श्वभूमीवर नयन रम्य उद्यान आहे. नांदेड येथे शीख समुदायाचा एक प्रमुख गुरुद्वारा असून शिखांचे शेवटचे गुरु गोविंदसिंग यांचे नांदेड येथे निधन झाले होते. आंध्रप्रदेशात कंदाकुर्ती येथे मंजिरा नदी , हरिद्रा नदी या उपनद्यांचा गोदावरीशी त्रिवेणी संगम होतो. या सुंदर संगमावर आंतरराज्य पूल आहे. शिवालय व स्कंद आश्रम नावाची प्राचीन देवालये आहेत. बासर येथे देवी सरस्वतीचे मंदिर असून, धर्मापुरी (करीमनगर जिल्हा ) हेसुद्धा प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. पट्टिसीमा ह्या नयनरम्य स्थळी गोदावरी नदीच्या मधोमध देवकूट डोंगरावर वीरभद्र मंदिर आहे. भद्राचलम् येथेही श्रीरामाचे सुंदर मंदिर आहे. राजमहेंद्री हे गाव राजमुंद्री या नावानेदेखील ओळखले जात असे. राजा महेंद्रवर्मन् हा इतिहासातला पहिला ज्ञात तेलुगू राजा येथे होऊन गेला. दौलैश्वरम येथे १०० वर्षे जुना आशियातील सर्वांत लांब लोहमार्ग पूल आहे. कोव्वुर, तानुकु, श्रीरामसागर प्रकल्प, पोचमपाड इत्यादी गोदावरी नदीवरील महत्त्वपूर्ण स्थळे आहेत. आंध्रप्रदेशात दर बारा वर्षांनी पुष्करम मेळा गोदावरी तीरावर भरतो, कुंभमेळ्याप्रमाणेच याचे स्नानमाहात्म्य सांगितले जाते.

•भौगोलिक

गोदावरी आणि कृष्णा नदी बंगाल उपसागरास मिळताना- सह्याद्रीच्या कुशीत पश्चिम घाटात १,०६७ मीटर उंचीवर सुरू होणाऱ्या गोदावरीचा प्रवास मुख्यत्त्वे दख्खनच्या पठारावरून साधारणत: आग्नेय दिशेने होतो. आंध्रप्रदेशात भद्राचलम्नंतर गोदावरी पूर्वेच्या निमुळत्या डोंगर रांगांतून (पापी टेकड्या) पुढे सरकते. या ठिकाणी तिची रुंदी २०० मीटरपेक्षा कमी तर खोली ६० फुटाच्या आत एवढीच असते. गोदावरी खोरे ३,१२,८१२ चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापते. त्यांतील महाराष्ट्रात १,५२,१९९ चौरस किलोमीटर, आंध्र प्रदेश ७३,२०१ चौरस किलोमीटर, मध्य प्रदेश ६५,२५५ चौरस किलोमीटर, ओरिसात १७,७५२ चौरस किलोमीटर तर कर्नाटकात गोदावरीने व्यापलेले खोरे ४,४०५ चौरस किलोमीटर आहे. गोदावरीचा त्रिभुज प्रदेश ५,१०० चौरस किलोमीटरचा असून अत्यंत सुपीक समजला जातो. तज्ज्ञांच्या मते या त्रिभुज प्रदेशाच्या उत्क्रांतीचे तीन मुख्य टप्पे असून शेवटच्या दोन टप्प्यांमध्ये गाळाचे प्रमाण जमिनींचा शेतीकरिता वाढता वापर व वाढत्या जंगलतोडीमुळे वाढल्याचे दिसून येते.

इतर नद्यांशी तुलना-

एकूण लांबीत गोदावरीचा जगात ९२वा क्रमांक आहे. ६,६९० किलोमीटर लांबी असलेली आफ्रिका खंडातील नाईल नदी प्रथम क्रमांकावर आहे. तर सिंधू नदी ३,१८० कि.मी. लांबीसह २१व्या क्रमांकावर आहे. ब्रह्मपुत्रा २,९४८ कि.मी.(२८वा क्रमांक), तर २,५१० कि.मी. वाहून गंगा ३९वा क्रमांकावर येते. यमुना १,३७६ कि.मी., सतलज १,३७० कि.मी. लांबीच्या आहेत व अनुक्रमे १०२ व १०३ क्रमांकांवर आहेत. कृष्णा १,३००
कि.मी. वाहून ११४व्या तर १,२८९ कि.मी. वाहून नर्मदा ११६व्या क्रमांक वर येते. १,००० कि.मी. पेक्षा अधिक लांबीच्या जगात सुमारे १६० नद्या आहेत.

अंटार्क्टिका आणि गोदावरी-
१३ कोटी वर्षांपूर्वी गोदावरी अंटार्क्टिका खंडातून वाहिली असेल का याचा भारतीय संशोधक शोध घेत आहेत. विभाजनपूर्व काळात दख्खनचे पठार आणि अंटार्क्टिका एकाच गोंडवन खंडाचा भाग राहिले असावेत असा शास्त्रज्ञांचा विश्वास आहे. पहा: महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या

उपनद्या आणि प्रकल्प-
ऊर्ध्व गोदावरी
दारणा - दारणा प्रकल्प, कोळगंगा - वाघाड प्रकल्प, उणंद - ओझरखेड प्रकल्प, कडवा - करंजवन प्रकल्प, प्रवरा नदी - भंडारदरा जिल्हा अहमदनगर , निलवंडे धरण, म्हाळूंगी - म्हाळूंगी प्रकल्प(सोनेवाडी ता. सिन्नर), आढळा - आढळा प्रकल्प, मुळा - मुळा प्रकल्प, शिवणी - अंबाडी प्रकल्प

मध्य गोदावरी
कर्पुरा नदी, दुधना नदी, यळगंगा नदी, ढोरा नदी, कुंडलिका नदी , सिंदफणा नदी , तेरणा नदी , मनार नदी,
तीरू नदी, सुकना नदी, माणेरू नदी, मंजिरा किन्नेरासानी नदी, पूर्णा नदी , मन्याड नदी, आसना नदी, सीता नदी , लेंडी नदी , वाण नदी , बिंदुसरा नदी

विदर्भ आणि मध्यप्रदेशातील वर्धेचे खोरे
मध्यप्रदेशातून येणारी वैनगंगा सातपुडा रांगांतून जवळपास ३६० मैलांचा प्रवास करून वर्धेस मिळते. वर्धा नदी मध्य प्रदशात मुलताई येथे सातपुडा रांगांतून विदर्भात येते. तेथे तिचा संगम वैनगंगा आणि पैनगंगा
या नद्यांशी होतो. नंतर गोदावरीस मिळेपर्यंत तिला प्राणहिता असे म्हणतात. मध्यप्रदेशातून येणारी इंद्रावती (इंद्रायणी) सातपुडा रांगांतून येऊन गोदावरीस मिळते.

खेक्रनाला - खेक्रनाला प्रकल्प, पेंच - पेंच प्रकल्प, बाग - बावनथडी (सागरा)प्रकल्प 

या विदर्भातून येणाऱ्या इतर उपनद्या आहेत कर्नाटकातून येणारी कर्नाटक राज्यातील गोदावरीचे पाणलोट क्षेत्र १७०१ वर्ग मैल आहे. मांजरा आणि तिच्या उपनद्या तेरणा, कारंजा, हलदी, लेंडी, मन्नार मिळून एकूण पाणलोट क्षेत्र ११९०० वर्ग मैल आहे.

ओडिशातून येणाऱ्या

इन्द्रावती नदी (काही ठिकाणी महाराष्ट्र राज्य व छत्तिसगड राज्याची सीमा इन्द्रावती नदीने निश्चित होते)
सिलेरू शबरी नदी आंध्र प्रदेशातील तालिपेरू

निसर्ग,शेती व आर्थिक-

नांदुर-मधमेश्वर, जायकवाडी जलअभयारण्यात रोहित , करकोचा , सारस पक्षांच्या विभिन्न प्रजाती आढळून
येतात. नैसर्गिकदृष्ट्या दख्खनच्या पठारावरील गोदावरीच्या सुरुवातीचा प्रदेश कमी पर्जन्यमानाचा असल्यामुळे मुख्यत्वे या प्रदेशात कापूस, ज्वारी ही पिके घेतली जातात. सिंचित क्षेत्रामध्ये मुख्यत्वे ऊस, कापुस व केळी ही पिके घेतली जातात. तेलंगण आणि आंध्रप्रदेशात साधारणपणे भाताची शेती केली जाते.
गोदावरी नदीत मुख्यत: गोड्या पाण्यातील Cyprinidae माशांच्या प्रजाती आढळून येतात. गोदावरीच्या त्रिभुज प्रदेशात ऍव्हिसेनिआ प्रजातीच्या मँग्रोव्ह झाडांची जंगले आढळतात त्यांना स्थानिक तेलुगू लोक माडा अडावी असे म्हणतात.मँग्रोव्ह झाडांची जंगले जमिनीचे आणि परिसराचे नैसर्गिकरीत्या संरक्षण करतात.

बंधारे, पूल, नौकानयन डौलेश्वर या गोदावरीच्या त्रिभुज प्रदेशातील बंधारा ब्रिटिश अभियंता सर आर्थर थॉमस कॉटन याने बांधून पूर्ण केल्यानंतर हे क्षेत्र भाताची शेती, नौकानयन व मासेमारी यामुळे संपन्न झाले. जलव्यवस्थापन महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्प गोदावरीतील पाणी ऋतूप्रमाणे कमी-अधिक असते. नदीतून वाहणार्या पाण्यापैकी ८०% पाणी जुलै- ऑक्टोबर या चार महिन्यातच वाहून जाते. उर्वरीत काळात खोऱ्यात दुष्काळाची स्थितीही असू शकते. हे पाणी व्यवस्थित वापरले जावे, पुरांचा प्रश्न मिटावा व ज्या ठिकाणी नदी पोहचत नाही त्या भागात पाणी उपलब्ध व्हावे यासाठी गोदावरी खोऱ्यात अनेक पाटबंधारे प्रकल्पांची निर्मिती केली गेली आहे. नदी खोऱ्यातील विविध समूहांच्या गरजा वाढल्यामुळे इतर नद्यांप्रमाणेच गोदावरी नदीच्या पाणीवाटपाचे प्रश्न गंभीर झाले आहेत. नदीकाठांवर व कालव्यांवर असलेली अनेक खेडी, शहरे, राज्ये इत्यादी पिण्यासाठी, शेतीसाठी व औद्योगिक वापरांकरिता लागणार्या पाण्याकरिता परस्परांशी संघर्ष करीत असतात. पाण्याचा अपव्यय टळावा व योग्य पाणीव्यवस्थापन व्हावे यासाठी शासन प्रयत्न करत असल्याचा दावा करते.

गोदावरीखोऱ्याचे पाणलोट क्षेत्र ३,१९,८१० कि.मी. असून भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या ९.५% भाग व्यापते. महाराष्ट्राकरिता गोदावरी खोऱ्यात १,७९८ टी.एम.सी. उपलब्ध पाण्यापैकी ७५% म्हणजे १,३१८ टी.एम.सी. भरवशाचे असले तरी आंतरराज्य निवाड्यानुसार महाराष्ट्राच्या वाट्यास अधिकतम १,०९७ टी.एम.सी. उपलब्ध होणार आहे. (कृष्णा खोरे १,२०१ टी.एम.सी., तापी खोरे ३२२ टी.एम.सी., नर्मदा खोरे २० टी.एम.सी. क्षमता असली तरी आंतरराज्य लवादानुसार सर्व खोरे मिळून एकूण १,८९० टी.एम.सी. पाणी महाराष्ट्रास उपलब्ध राहील. आंध्र प्रदेश राज्यास किमान १,४८० टी.एम.सी. पाणी गोदावरी खोऱ्यातून मिळू शकते.

गोदावरीवरील काही सिंचन प्रकल्प-

जायकवाडी धरण, पैठण नाशिक व मराठवाडा मिळून ६६ लाख हेक्टर शेतीयोग्य जमिनींपैकी १६ टक्के क्षेत्रास सिंचनाचा फायदा झाला आहे तर अधिकतम प्रलंबित क्षमता २९ टक्के एवढी आहे. पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाने किमान १,३२,००० हेक्टर जमीन भिजणे प्रस्तावित होते परंतु प्रत्यक्षात ४५,००० हेक्टर जमीनच सिंचनाखाली येऊ शकली. विष्णुपुरी उपसा जलसिंचन प्रकल्प (आशियातला सर्वांत मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प - नांदेड) मराठवाडा विभागात सर्व प्रकल्प मिळून ४८,००,००० हेक्टर शेतजमिनींपैकी ८,००,००० हेक्टर जमीन सिंचनाखाली आहे. याशिवाय गोदावरीवर गंगापूर, नांदूर, मधमेश्वर (इ.स.१९०७), भावली(प्रस्तावित), वाकी(प्रस्तावित), भाम(प्रस्तावित), मुकणे(प्रस्तावित) , अलिसागर - निझामाबाद पूरकालीन उपसा सिंचन प्रकल्प, श्रीरामसागर प्रकल्प - पोचमपाड, पोलावरम प्रकल्प (प्रस्तावित) इत्यादी प्रकल्प आहेत. 

उपनद्यांवरील बंधारे
जलापुट बंधारा मचकुंड नदीवर आंध्रप्रदेश- ओडिशा सीमेवर आहे. बालीमेला सिंचन प्रकल्प (ओरिसा), अप्पर इंद्रावती नदी प्रकल्प, मंजीरा नदीवर निजामसागर प्रकल्प, कड्ड्म प्रकल्प, मेहबूबनगर प्रकल्प, लोअर तेरणा प्रकल्प, पुर्णा प्रकल्प, अप्पर पैनगंगा प्रकल्प, लोअर दुधना प्रकल्प, भंडारा सिंचन प्रकल्प, मुळा प्रकल्प, अप्पर प्रवरा प्रकल्प, अप्पर वैनगंगा, गोदावरी कॅनॉल, मनार प्रकल्प - कंधार, ऊर्ध्व पैनगंगा - पुसद इत्यादी.

नैसर्गिक आपत्ती-

अतिवृष्टी, पुरांची नैसर्गिक संकटे आणि कोरडे दुष्काळ दोन्हीही गोदावरीच्या खोऱ्यात आढळून येतात. पुरांमुळे नदीतील सुपीक गाळाचा लाभही परिसरातील प्रदेशाला होतो. वाढत्या सिंचन क्षमतांमुळे पूर्वीपेक्षा पूर धोकापातळी कमी झाली असली तरी नदीपात्रातील वृक्षतोडीनंतर नदीपात्रात वाढणारा गाळ आणि पात्रालगतच्या वाढत्या मनुष्यवस्तीमुळे आर्थिक हानी व मनुष्यहानी वाढल्याचे दिसून येत आहे.

प्रदूषण-

गोदावरी नदीत नजीकच्या मोठ्या नागरवस्तीतून येणाऱ्या सांडपाण्यापासून सर्वाधिक ८५% प्रदूषण होते. मान्सून सोडून इतर काळातील सिंचनोत्तर काळात नदीचे प्रवाह आधीच रोडावलेले व कमी वेगाचे असताना नदीची नैसर्गिक शुद्धीकरणाची प्रक्रिया मंदावते. शिवाय सांडपाणी सोडल्यामुळे पिण्याचे पाणी वरचे वर न घेता नदी पात्रातील विंधन विहिरींद्वारे अथवा धरणांतून घेतले जाते त्यामुळे पाणीनियोजन बिघडते व खर्चही वाढतो. उरलेले १५% प्रदूषण औद्योगिक कारणांमुळे होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा