Post views: counter

भारतीय संस्कृती आणि वारसा

                           भारतीय संस्कृतीचा इतिहास समृद्ध आणि वैविध्यपूर्ण आहे. आर्याचे स्थलांतर, ग्रीक, पíशयन, शक, पहलव, कुशाण, हूण यांची प्राचीन काळातील आक्रमणे, त्यांचे भारतीयीकरण तसेच मध्ययुगीन काळातील इस्लामिक आक्रमणे व त्यांचे भारतीयीकरण या प्रक्रियेतून भारतीय संस्कृती समृद्ध आणि वैविध्यपूर्ण झाली. हा संपूर्ण सांस्कृतिक प्रवास राजकीय, सामाजिक, आíथक, धार्मिक मन्वंतरांमधून घडतो, उत्क्रांत होतो. या मन्वंतरांच्या संदर्भासहित केलेला संस्कृतीचा अभ्यास अधिक सयुक्तिक ठरतो.


                           संस्कृतीचा अभ्यास म्हणजे नेमक्या कोणत्या घटकांचा अभ्यास हे स्पष्ट करणे आवश्यक आहे. संस्कृतीमध्ये भाषा व साहित्य, वास्तुकला तसेच संगीत, नृत्य, शिल्पकला, चित्रकला यासारख्या कलाविष्कारांचा अंतर्भाव होतो. एखाद्या कालखंडातील संस्कृतीच्या या सर्व अंगांचा अभ्यास व दोन किंवा अधिक कालखंडामधील त्यांचा परस्परसंबंध नि उत्क्रांती यांचे आकलन अपेक्षित आहे. यासाठी किंबहुना इतिहासाच्या कोणत्याही अंगाच्या आकलनासाठी भारतीय इतिहासाची ढोबळ रूपरेखा पूर्णपणे समजून घेणे अत्यावश्यक ठरते. यात भारतीय
अश्मयुगाचा अंतर्भाव करण्याची फारशी आवश्यकता नाही. अश्मयुगाचा NCERT च्या पुस्तकांतून केलेला अभ्यास पुरेसा ठरतो. प्राचीन भारत (सिंधू संस्कृती; वैदिक काळ; वेदोत्तर/ मौर्यपूर्व काळ; मौर्यकाळ/ साम्राज्य; मौर्योत्तर/ गुप्तपूर्व काळ; गुप्त काळ/साम्राज्य; गुप्तोत्तर काळ), मध्ययुगीन भारत (सुरुवातीचा मध्ययुगीन काळ (चोल साम्राज्य; गुर्जर प्रतिहार, राष्ट्रकुट, पाल यांचा संघर्ष); मध्ययुगीन काळ (सुल्तानशाही; मुघल साम्राज्य; दक्षिणेमध्ये विजयनगर व बहमनी राज्ये), आधुनिक भारत (कंपनीचा काळ; भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाचा काळ; भारतीय स्वातंत्र्याची चळवळ; स्वातंत्र्योत्तर भारत) याला भारतीय इतिहासाची ढोबळ रूपरेखा म्हणता येईल. भारतीय संस्कृतीच्या संदर्भात आपण याचा विचार करू.
                           सिंधू संस्कृतीमध्ये त्या संस्कृतीची वैशिष्टय़े, महत्त्वाची शहरे, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, समाज, धार्मिक धारणा, लिपी, मृतदेह पुरण्याच्या पद्धती, महत्त्वाचे अवशेष व त्यांचा अर्थ आणि या संस्कृतीचा ऱ्हास यांचा अंतर्भाव होतो. सिंधू संस्कृती व आर्याचे आगमन यांबाबत इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. सिंधू संस्कृतीचे लोक व आर्य यांच्यामध्ये कोणता असा संबंध होता की सिंधू संस्कृतीच्या संपूर्ण ऱ्हासानंतर आर्य आले हा मतभेदाचा मुख्य मुद्दा ठरतो.
                        वैदिक काळापासून पुढे मात्र भारतीय इतिहास एका विशिष्ट उत्क्रांतीची साखळी दर्शवितो. वैदिक काळाची विभागणी दोन कालखंडात केली जाते- ऋग्वेदिक काळ व नंतरचा वैदिक काळ. कारण ऋग्वेद रचला गेलेला काळ व त्यानंतरचा काळ हे उत्क्रांतीचे दोन टप्पे दर्शवितात. ऋग्वेदिक काळातील भटकी अर्थव्यवस्था नंतरच्या वैदिक काळात शेतीप्रधान होते. ऋग्वेदिक काळातील धार्मिक धारणा या साध्यासोप्या होत्या. देवाची साधी गद्य स्तुती ही पूजा होती. बालविवाहाची प्रथा नव्हती तर विधवा पुनर्वविाहास संमती होती. स्त्रियांना शिक्षणाचा व सार्वजनिक सभांमध्ये सहभागाचा हक्क होता. इतकेच नव्हे तर ऋग्वेदाच्या काही ऋचा या स्त्रियांनी रचल्या. नंतरच्या वेदिक काळात देवाची पद्य स्तुती (सामवेद), मंत्रांचा वापर (यजुर्वेद), जादूई मंत्रांचा वापर (अथर्ववेद) असा प्रवास दिसतो. याबरोबरच नंतरच्या वेदिक काळात यज्ञविधी व पशुबळी यांचे स्तोम वाढताना दिसते. ब्राह्मण या साहित्यप्रकारामध्ये विधीशास्त्रांचा ऊहापोह दिसतो. यज्ञविधी व पशुबळी यांच्या अतिरेकाला पहिली प्रतिक्रिया म्हणजे अरण्यक (ध्यानातून ज्ञानप्राप्ती) व उपनिषद (तत्त्वज्ञान) ही साहित्यकृती होय. या दोन्ही साहित्यकृतींनी विधींच्या अतिरेकावर टीका केली. ही प्रतिक्रिया मात्र वैदिक धर्मातर्गत प्रतिक्रिया ठरते.
                              विधी व पशुबळी यांच्या अतिरेकाला मिळालेल्या प्रतिक्रियांपकी वेदिक धर्माच्या अधिसत्तेला अमान्य करत वेगळे पर्याय निर्माण करणारी प्रतिक्रिया म्हणजे वेदोत्तर/मौर्यपूर्व काळात ६४ वेगवेगळ्या पंथांचा उदय. या ६४ पंथांपकी जैन व बौद्ध धर्मानी खऱ्या अर्थानी वैदिक धर्माला पर्याय निर्माण केला व त्याहीपुढे जाऊन बौद्ध धर्माने नवे आव्हान निर्माण केले. या दोन्ही धर्माच्या तत्त्वज्ञानाचा (जैन व बौद्ध साहित्य) सखोल अभ्यास आवश्यक ठरतो. या तत्त्वज्ञानाने भारतामध्ये धार्मिक सुधारणेचा पाया घातला व भारतीय समाज व संस्कृतीवर दूरगामी परिणाम केला.
                             या व्यतिरिक्त या काळातील महत्त्वाची बाब म्हणजे महाजनपदांचा उदय. हासुद्धा एका ताíकक उत्क्रांतीचा टप्पा ठरतो. ऋग्वेदिक काळातील भटक्या टोळ्या (जन) नंतरच्या वैदिक काळात स्थायिक होतात (जनपद). स्थर्य प्राप्त झालेल्या मानवी वसाहतींची वाटचाल स्थिर शेती, अधिकचं उत्पादन यातून नागरिकीकरणाकडे (महाजनपदे) होते. या नागरी केंद्रांभोवती (महाजनपदे) राज्यांची निर्मिती होते. विविध स्त्रोतांमध्ये वेगवेगळे आकडे जरी असले तरी १६ महाजनपदांचा उदय मान्य केला जातो. यापकी वत्स, अवंती, कोसल व मगध ही बुद्धांच्या काळातील महत्त्वाची महाजनपदं होय. सर्व महाजनपदांमध्ये मगध सर्वश्रेष्ठ ठरते. मौर्यापूर्वी हिरण्यक (िबबीसार, अजातशत्रू, उदयी इ.), शिशुनाग व नंद या घराण्यांनी मगधवर राज्य केले व त्याचा विस्तार केला. या काळातील तिसरा महत्त्वाचा धागा म्हणजे पारशी व ग्रीकांची परकीय आक्रमणे व त्यातून झालेली सांस्कृतिक देवाण-घेवाण. भारतावर आक्रमण करणारा सायरस हा पíशयन सम्राट होता, तर नंदांच्या काळात अलेक्झांडरचे आक्रमण होते. महाजनपदांव्यतिरिक्त काही गणसंघांचे अस्तित्वही महत्त्वाचे ठरते.
मौर्य साम्राज्य हे भारतातील पहिले व एक वैभवशाली साम्राज्य म्हणून गणले जाते. मौर्याच्या या काळातील कौटिल्याचे अर्थशास्त्र (या १५ पुस्तकांच्या नेमक्या कालखंडाबाबत वाद आहे.) अशोकचे स्तंभ व शिलालेख, अशोकाचा धम्म (हा धर्म नसनू एक संहिता आहे), बौद्ध धर्माचा प्रसार, स्तूप, विहार, चैत्य यातील वास्तुकला यांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. मौर्य साम्राज्याने जवळपास संपूर्ण भारतीय उपखंडाला एक केंद्रिभूत प्रशासन दिले व त्यातून रस्ते, कालवे, सिंचन यांसारख्या पायाभूत सुविधांचा विकास केला. या पायाचा उपयोग पुढील कालखंडातील (मौर्योत्तर /गुप्तपूर्व ) आर्थिक भरभराटीला झाला. याव्यतिरिक्त ग्रीक, शक, पहलव, कुशाण यांच्या या आक्रमणांमुळे जगातील अनेक भागांची भारतीय व्यापाऱ्यांना ओळख झाली. उत्तर - पश्चिमी भागात ग्रीक, शक, पहलव, कुशाण यांची राज्ये, पूर्वेकडे मौर्याना उलथवून टाकणारे शुंग राज्य,  दक्षिण मध्य भागात सातवाहनांचे राज्य, दक्षिणेत चोल, चेरा, पाण्डय़, चालुक्य, काकतिय, होयसाळ इत्यादींची राज्ये असा काहीसा राजकीय पट दिसतो. या राजकीय विकेंद्रीकरणातून निर्माण झालेल्या स्वायत्ततेमुळे या काळात व्यापार, साहित्य, विज्ञान, कला, वास्तुकला अशा अनेक क्षेत्रांत मोठी प्रगती दिसून येते. या काळातील समाजाला स्थैर्य प्राप्त करून देणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे श्रेणी (Guild) होय. अनेक इतिहासकारांच्या मते, श्रेणींमधूनच भारतामध्ये संकीर्ण जातींचा उदय होतो. श्रेणींच्या माध्यमातून व्यापारास मोठी चालना मिळाली व भारताचा परकीय व्यापार वाढला. धातूकाम, वस्त्रोद्योग, मौल्यवान खडे, मोती, हस्तिदंत, काच, नाणी या उद्योगधंद्यांमध्ये मोठी प्रगती दिसून येते. यातून निर्माण झालेल्या समृद्धीचा परिणाम मौर्योत्तर व गुप्त काळातील समृद्ध सांस्कृतिक अभिव्यक्तीवर स्पष्ट जाणवतो. गांधार, मथुरा, अमरावती ही वैशिष्टय़पूर्ण कलेची केंद्रे, धर्मशास्त्र, वेदांग, पुराण या स्मृती साहित्याची निर्मिती, वैद्यकशास्त्र (चरक, शुश्रूत), संस्कृत व्याकरण (पाणिनी, पतांजली), नाटके व काव्य (हाल, अश्वघोष, भाष, वात्सायन), महायान बौद्ध तत्त्वज्ञान (नागार्जुनाचे माध्यमिक तत्त्वज्ञान, मििलदपान्हो), सहा पारंपरिक तत्त्वज्ञानांचा विकास (सांख्य, योग वैषेशिक, न्याय, वेदान्त व मीमांसा), भगवद्गीतेचे तत्त्वज्ञान यांचा समावेश या काळातील संस्कृतीमध्ये होतो. तद्वतच या काळात दक्षिण भारतामध्ये संगम साहित्याची निर्मिती होते. ज्यातून दक्षिण भारतातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक जीवनावर प्रकाश पडतो. संस्कृतीचा अभ्यास ऐतिहासिक उत्क्रांतीच्या अनुषंगाने करणे उपयुक्त ठरते. कोणत्याही कालखंडाच्या संस्कृतीचा अभ्यास करताना तत्कालीन सामाजिक, आíथक व राजकीय संदर्भाचा अभ्यास आवश्यक ठरतो. कारण हा संदर्भ कलेच्या, साहित्याच्या अभिव्यक्तीमध्ये प्रतििबबित होतो. सिंधू संस्कृतीच्या कालखंडापासून मौर्योत्तर कालखंडापर्यंतचा संस्कृतीच्या प्रवासाच्या सारांशाचा आपण वेध घेण्याचा प्रयत्न या लेखात केला. त्याचा संदर्भासहित सखोल अभ्यास आयोगाच्या परीक्षेसाठी महत्त्वाचा ठरतो.

                               भारताच्या दुसऱ्या साम्राज्याचा म्हणजेच गुप्त साम्राज्याचा कालखंड हा भारताच्या प्राचीन इतिहासाच्या उत्क्रांतीच्या शृंखलेतील महत्त्वाचा दुवा ठरतो. हा कालखंड ठरतो तो सांस्कृतिक उत्क्रांतीच्या उच्चतम पातळीचा. तद्वतच हा कालखंड ठरतो एका मुख्य सामाजिक मन्वंतराचा. वाढत्या सामंतशाहीचा समाजावरील प्रभाव गुप्तोत्तर कालखंडातील प्राचीन कालखंडाच्या अस्तास व मध्ययुगीन कालखंडाच्या उगमास कारणीभूत ठरतो.
                               गुप्त साम्राज्याच्या कालखंडाला काही इतिहासकार 'सुवर्णयुग' असे म्हणतात, तर काही इतिहासकार 'सुवर्णयुगाची दंतकथा' म्हणून त्यावर टीका करतात. या वादावर भाष्य करण्यापेक्षा गुप्त कालखंडातील समृद्ध संस्कृतीचा अभ्यास करणे अधिक श्रेयस्कर ठरते. अर्थात, या समृद्ध सांस्कृतिक अभिव्यक्तीला मौर्याच्या काळात घातल्या गेलेल्या पायाची व मौर्यात्तर काळातील व्यापारी समृद्धीची पाश्र्वभूमी लाभली होती यात शंका नाही. या काळात शिक्षण, साहित्य, गणित, खगोलशास्त्र, धातूशास्त्र, वैद्यकशास्त्र अशा अनेक क्षेत्रांत कमालीची सर्वागीण प्रगती झाली. शिक्षणामध्ये नालंदा विद्यापीठ; गणित व खगोलशास्त्रामध्ये वराहमिहीर, ब्रह्मगुप्त व त्याहीपेक्षा महत्त्वाचे, वैशिष्टय़पूर्ण व आश्चर्यकारक असे आर्यभट्टाचे योगदान; साहित्यामध्ये जगप्रसिद्ध कालिदास, विशाखादत्त, भारवी, कुमारदास, भट्टी, अमरू, वज्जीका, शूद्रक, सुबंधू, हर्षवर्धन व बाणभट्ट (गुप्तोत्तर काळ), भवभूती यांचे योगदान; संस्कृत व्याकरणामध्ये भरत्रीहरी, अमरसिंह, चंद्रगोमिया यांचे कार्य; वरारुची, चंद यांचे प्राकृत व पाली व्याकरणातील कार्य; धार्मिक साहित्यामध्ये पुराण, महाभारत, रामायण, बौद्ध साहित्य, जैन साहित्य या सर्वाचा समावेश या काळातील अत्यंत समृद्ध संस्कृतीमध्ये होतो. याव्यतिरिक्त वास्तुकलेमधील नगर व द्रविड कलांचा उदय, शिल्पकला व चित्रकलेचाही यात अंतर्भाव होतो. गुप्तोत्तर काळातील वैभवशाली राजा हर्षवर्धनाचा मृत्यू (६४७ AD) प्राचीन इतिहासाचा अस्त दर्शवतो.
सुरुवातीच्या मध्ययुगीन काळामध्ये उत्तरेतर गुर्जर-प्रतिहार, राष्ट्रकूट व पाल या तिघांचा कनौजवरील नियंत्रणासाठीचा संघर्ष, तर दक्षिणेत चोल साम्राज्याचा उदय असे काहीसे चित्र दिसते. या कालखंडातील संस्कृतीमध्ये प्रतिहारांच्या दरबारातील ्नराजशेखरचे साहित्य, पालांनी भरभराटीस आणलेले नालंदा विद्यापीठ व नव्याने स्थापन केलेले विक्रमशिला विद्यापीठ, राष्ट्रकुटांच्या राजाश्रयाखालील संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश व कन्नड साहित्य, वेरुळ येथील राष्ट्रकुटांची प्रसिद्ध मंदिरं यांचा समावेश होतो. याव्यतिरिक्त राजपूत, पाल, चालुक्य, प्रतिहार वास्तुकला, चोल मंदिरं, सोलंकी कला, चोलांची धातूमधील शिल्पकला (नटराज), चोल चित्रकला यांचाही अंतर्भाव होतो.

                             गुर्जर-प्रतिहारांच्या ऱ्हासानंतर उत्तर-पश्चिम भारतावर मुस्लीम आक्रमणं होताना दिसतात. महमूद गझनी व मोहम्मद घुरी यांच्या एकानंतर एक स्वाऱ्या व तद्नंतर दिल्लीच्या सुलतानशाहीची स्थापना असा घटनाक्रम आहे. सुलतानशाही व मुघल काळात खूप मोठय़ा प्रमाणावर इतिहासलेखन झाले. मिन्हास-उस्-सिराज, झिया-उद्-दीन बरानीपासून अबूल फझल, मुहम्मद हाशिम खाफी खानपर्यंत ही एक मोठी साखळीच आहे. गझनी, घुरीपासून औरंगजेब व त्यानंतरच्या बादशहांच्या अनेक घटनांवर व वेगवेगळ्या अंगांवर या इतिहासलेखनाने प्रकाश टाकला आहे. त्याचबरोबर जॉन फ्रेअर, फ्रँकाइस बíनयर, निकोलो मॅनुसी यांसारख्या परकीय प्रवाशांच्या पुस्तकांचाही यात समावेश करता येईल. याव्यतिरिक्त संस्कृत पुस्तकांचे पíशयन भाषांतर, अमिर खुस्रोचे काव्य यांचा साहित्यामध्ये समावेश होतो. वास्तुकलेमध्ये इस्लामिक व भारतीय वैशिष्टय़ांचा मिलाफ दिसून येतो. ताजमहल ही सुलतानशाहीपासूनच्या वास्तुकलेच्या उत्क्रांतीची सर्वोच्च प्रतीची अभिव्यक्ती म्हणता येईल. तसेच विजयनगर या समृद्ध राज्यामध्ये विशिष्ट वास्तुकलेची निर्मिती झालेली होती. या काळात संगीत, चित्रकला (मुघल चित्रकला), विणकाम यांमध्ये मोठी प्रगती झाली. भारतीय समाजावर दूरगामी परिणाम करणाऱ्या सूफी व भक्ती चळवळीचा अभ्यासही महत्त्वाचा ठरतो.
                                आधुनिक कालखंडातील वास्तुकला, संगीत, नृत्य, चित्रपट, रंगमंच व कलेला प्रोत्साहन देणाऱ्या संस्थांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. युरोपियन लोकांच्या आगमनानंतर कलेच्या अनेक क्षेत्रांत युरोपियन वैशिष्टय़े आढळतात. वास्तववादी छायांकन (Realistic Shading), परिप्रेक्ष्य (Perspective), त्रिमितीय (Three-Dimensional) चित्रीकरण या युरोपियन वैशिष्टय़ांनी मुघल चित्रकलेला समृद्ध केले. भारताच्या वसाहतवादी कालखंडातील वास्तुकलेवर युरोपियन प्रभाव स्पष्ट जाणवतो. त्यामध्ये गॉथिक, रोमन, ब्रिटिश, पोर्तुगीज वैशिष्टय़े आढळतात. भारतीय संगीताची मुळे सामवेदामध्ये असून भरताच्या नाटय़शास्त्र या साहित्य कलाकृतीमध्ये त्याचा अभ्यास दिसून येतो. कदाचित मध्ययुगीन काळातील उत्तर भारतीय संगीतावरील पíशयन प्रभावामुळे उत्तर व दक्षिण भारतातील संगीतामधील भेद स्पष्ट होण्यास सुरुवात होते. त्यातून िहदुस्तानी व कर्नाटकी भारतीय संगीतातील दोन मुख्य प्रवाह विकसित होतात. या दोन संगीत प्रकारांतील फरक, मूलभूत तांत्रिक संकल्पना व महत्त्वाचे घराणे यांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. भरताच्या नाटय़शास्त्रामध्ये नृत्यविषयक सखोल समीक्षा आहे. भारतीय अभिजात नृत्य (भरतनाटय़म, कथकली, मोहिनीअट्टम, ओडीसी, कथ्थक, कुचीपुडी, मणीपुरी, सत्तरीय), त्यांची मुख्य वैशिष्टय़े व घराणे यांचा अभ्यास आवश्यक आहे. आधुनिक काळातील महत्त्वाचे चित्रकार, संगीतकार, नृत्य कलाकार, भारतीय चित्रपट व रंगमंचाचा विकास, विविध कलांना प्रोत्साहन देणाऱ्या संस्था यांचा एक ढोबळ आढावा फायद्याचा ठरू शकतो.
                              भारतीय संस्कृतीवरील या लेखांमधील विश्लेषण या घटकाची व्याप्ती स्पष्ट करणारा जलद आढावा ठरतो. भारतीय इतिहासाची रूपरेखा स्पष्ट करणाऱ्या मूलभूत क्रमिक पुस्तकांच्या आकलनानंतर भारतीय संस्कृतीवरील एखाद्या प्रमाणित संदर्भग्रंथाचे वाचन पुरेसे ठरावे.
मूलभूत क्रमिक पुस्तकांच्या माध्यमातून केलेला सामाजिक, आíथक, राजकीय अंगाचा 'आवश्यक किमान' अभ्यास या संपूर्ण प्रक्रियेला पूर्णत्व प्राप्त करून देणारा ठरतो.    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा