Post views: counter

Current Affairs February 2017 Part- 4



🔹कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण राज्यात सर्वोत्कृष्ट

कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणने गेल्या वर्षभरात राज्यात सर्वोत्कृष्ट काम केले. या कामाची दखल घेऊन उच्च न्यायालयाने जिल्हा विधी सेवा
प्राधिकरणास सर्वोत्कृष्ट विधी सेवा प्राधिकरणाचा पुरस्कार जाहीर केला. मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात झालेल्या समारंभात जिल्हा विधी प्राधिकरणचे चेअरमन न्या. आर. जी. अवचट आणि सचिव न्या. उमेशचंद्र मोरे यांना उच्च न्यायालयाच्या मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

जे लोक न्याय यंत्रणेपर्यंत पोहोचू शकत नाहीत, त्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांना वेळेत, तसेच सुलभतेने न्याय मिळावा यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणने महत्त्वाचे योगदान दिले आहे. दिवाणी खटले, मिटवता येण्यासारखे फौजदारी खटले, मोटार अपघात नुकसान भरपाईची प्रकरणे, जमीन अधिग्रहण खटले, विमा कंपनी, बॅंक वसुलीसंबंधी खटले, कौटुंबिक वादासंबंधी खटले, अशा सर्व दाखल व दाखलपूर्व खटल्यांचा जास्तीत जास्त निपटारा करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणने काम केले आहे. यासाठी वेळोवेळी जनजागृती करून न्यायापासून वंचित राहणाऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न विधी सेवा प्राधिकरणने केला आहे. या कामाची दखल घेऊन उच्च न्यायालयाने कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला राज्यातील सर्वोत्कृष्ट कार्याचा पुरस्कार देण्यात आला.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹माजी सरन्यायाधीश अल्तमस कबीर यांचे निधन

सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश अल्तमस कबीर (वय 68) यांचे आज कोलकाता येथे दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यावर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व मुलगी असा परीवार आहे.



कबीर हे सर्वोच्च न्यायालयाचे 39 वे सरन्यायाधीश होते. 2013 मध्ये ते या पदावरून निवृत्त झाले होते. त्यांचा जन्म 29 सप्टेंबर 1948 मध्ये झाला होता. एलएलबी पदवी संपादन केल्यानंतर ते 1973 मध्ये कोलकाता बार असोसिएशनचे सदस्य बनले. येथून त्यांची कारकिर्द सुरु झाली. कोलकाता उच्च न्यायालयात वकील म्हणून कार्यरत असणाऱ्या कबीर यांची 1990 मध्ये मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती.

सरन्यायाधीश म्हणून कबीर यांची कारकीर्द विवादास्पद राहिली. कबीर यांनी जाणीवपूर्वक आपली पदोन्नती रोखल्याचा आरोप गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश भास्कर भट्टाचार्य यांनी मागे केला होता. सहारा-सेबी, प्रकरणाची सुनावणी ज्या पीठासमोर सुरू होती. त्यात कबीर यांनी बदल करून ती आपल्या हातात घेतल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला होता.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹'स्पेस-एक्स'च्या फाल्कन-9 रॉकेटचे प्रक्षेपण

सुमारे 50 वर्षांपूर्वी चांद्रमोहिमेवर जाणाऱ्या अंतराळवीरांनी जिथून उड्डाण केले त्या 'नासा'च्या लाँच पॅडवरून स्पेस-एक्सच्या फाल्कन-9 रॉकेटचे रविवारी प्रक्षेपण करण्यात आले. अवकाश स्थानकाला पुरवठा करण्यासाठी हे रॉकेट सोडण्यात आले आहे.

चांद्रयानाचे प्रक्षेपण करण्यासाठी येथील लाँचपॅड वापरले जाते. प्रदीर्घ काळापासून ते वापरले गेले नव्हते. अंतराळातील ये-जा करण्याची मोहीम (शटल प्रोग्रॅम) सहा वर्षांपूर्वी संपल्यानंतर नासाचे अत्यंत महत्त्वाचे आणि ऐतिहासिक असे लाँच काँप्लेक्स 39ए प्रथमच उड्डाणासाठी वापरण्यात आले.

अमेरिकेतील अवकाशसंबंधी निर्मिती आणि वाहतूक करणारी अवकाश संशोधन तंत्रज्ञान महामंडळ तथा स्पेस-एक्स ही संस्था आहे. मागील वर्षी उन्हाळ्यात एका रॉकेटचा स्फोट झाल्यानंतर स्पेस-एक्सच्या वतीने प्रथमच फ्लोरिडातून रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले.

केनेडी स्पेस सेंटर येथे मानवरहित फाल्कन-9 रॉकेटचे उड्डाण पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडे माल वाहून नेणारे हे रॉकेट आकाशात झेपावल्यानंतर 10 सेकंदांत ढगांमध्ये गायब झाले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹आयपीएल लिलाव: स्टोक, मिल्सची कोटींची भरारी

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताच्या संघाची विजयी घोडदौड एकीकडे चालू असतानाच दुसरीकडे चाहत्यांमध्ये आकर्षण असणाऱ्या 'आयपीएल'च्या लिलावात इंग्लंडचे खेळाडू बेन स्टोक आणि टायमल मिल्स यांना सर्वाधिक बोली लावून खरेदी करण्यात आले. स्टोक्सला तब्बल 14.50 कोटी रुपयांना रायझिंग पुणे सुपरजायंट्सने आणि मिल्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने 12 कोटी रुपयांना खरेदी केले.

आयपीएलच्या दहाव्या मोसमासाठी आज (सोमवार) बंगळूरमध्ये क्रिकेटपटूंचा लिलाव झाला. एकूण 551 क्रिकेटपटूंसाठी बोली लागणार आहे. करारानुसार हा अखेरचा लिलाव असल्यामुळे फ्रॅंचाइजी किती खर्च करतात, याकडे सर्वांचे लक्ष होते. पुढील वर्षी सर्वच खेळाडू लिलावासाठी पात्र ठरणार असल्यामुळे या वर्षी कुणाला घ्यायचे? कुणाला नाही? यासाठी फ्रॅंचाइजींचे "थिंक टॅंक' चांगलेच व्यग्र आहेत.

फ्रॅंचाइजींना खर्च करण्यासाठी कोट्यवधी रुपये असले, तरी फलंदाज, गोलंदाज यापेक्षा अष्टपैलू खेळाडूंकडे फ्रॅंजाइजी मालकांचा कल अधिक होता. त्यामुळेच यंदा बेन स्टोक्सच्या नावाची चांगलीच हवा होती. लिलावासाठी स्टोक्सची 2 कोटी पायाभूत किंमतीपासून लिलावात त्याची सुरवात झाली. सर्वच फ्रेंचायजींनी त्याच्या खरेदीसाठी चढाओढ केल्याने त्याला अखेर पुणे संघाने 14.50 कोटी रुपयांना खरेदी केली. तर, दुसरीकडे गेल्या लिलावात 8.50 कोटी रुपये मिळालेल्या पवन नेगीला अवघे 1 कोटी रुपये मिळाले. त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने विकत घेतले. इंग्लंडच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार इयान मॉर्गनला किंग्ज इलेव्हन पंजाबने आणि श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यूजला दिल्ली डेअरडेव्हिल्सने प्रत्येकी 2 कोटींना खरेदी केले.

 भारताविरुद्धच्या मालिकेतील यशाचे फळ गोलंदाज मिल्सला मिळाले. त्याला 12 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले.
बंगळूर आणि हैदराबाद यांच्यात दहाव्या मोसमाची पहिली लढत होणार असली, तरी आज येथील स्टार हॉटेलमध्ये मैदानाबाहेरचे लिलावाचे नाट्य रंगले. लिलाव करण्यासाठी प्रसिद्ध असणारे वेल्सचे रिचर्ड मेडले यांनी लिलावाचा हातोडा सांभाळला. लिलावातून 75 खेळाडूंची निवड होणार असली, तरी यासाठी तब्बल 352 क्रिकेटपटू उपलब्ध होते.

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू लिलावासाठी उपलब्ध असले, तरी ते पूर्ण मोसम खेळू शकणार नाहीत. दोन्ही देशांमध्ये मे महिन्यातच द्विपक्षीय मालिका असल्यामुळे या खेळाडूंना मेच्या पहिल्या आठवड्यातच "आयपीएल'चा निरोप घ्यावा लागणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹शाहिद आफ्रिदीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.

आक्रमक फलंदाजी आणि उंच फटके मारण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आफ्रिदीने यापूर्वीच 2010 मध्ये कसोटी क्रिकेटमधून आणि 2015 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आता त्याने आपली 21 वर्षांची क्रिकेट कारकिर्दी थांबविण्याचा निर्णय घेतला. आफ्रिदीने या महिन्याच्या सुरवातीलाच निवृत्ती घेणार असल्याचे संकेत दिले होते. जगभरातील लीगमध्ये खेळण्यास उत्सुक असल्याचे आफ्रिदी म्हणाला होता.

आफ्रिदीने 1996 मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आपल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 37 चेंडूत शतक झळकाविण्याचा विश्वविक्रम केला होता. त्याचा हा विक्रम 17 वर्षे अबाधित होता. आफ्रिदीने 398 एकदिवसीय सामन्यांत 8064 धावा आणि 395 बळी घेतले आहेत. त्यामुळे त्याची ओळख अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून होती.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारतातील एकमेव ज्वालामुखी जागृत

भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी असलेला अंदमान, निकोबार बेटांवरील पुन्हा जागृत झाल्याची चिन्हे आहेत. या ज्वालामुखीच्या तोंडातून राख बाहेर पडणे सुरू झाले आहे. यापूर्वी १९९१मध्ये हा ज्वालामुखी जागृत झाला होता, अशी माहिती येथील राष्ट्रीय सागरविज्ञान संस्थतर्फे (एनआयओ) देण्यात आली. अंदमान-निकोबार बेटांवरील या ज्वालामुखी पुन्हा जागृत झाला आहे. पोर्ट ब्लेअरपासून १४० किलोमीटर ईशान्येला बॅरेन बेटांवर हा ज्वालामुखी आहे. सुमारे १५० वर्षे निद्रिस्त अवस्थेत राहिल्यानंतर १९९१ मध्ये तो जागृत झाला होता, अशी माहिती एनआयओच्या वतीने देण्यात आली.

गोव्यातील अभय मुधोळकर यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांचे पथक सध्या या ज्वालामुखीचा अभ्यास करीत आहे. त्यांनीच हा ज्वालामुखी जागृत झाल्याची नोंद प्रथम केली. २३ जानेवारी रोजी सीएसआयआर-एनआयओचे आरव्ही सिंधू ही नौका बॅरन बेटांच्या परिसरात गेली होती. त्यावेळी संशोधकांचे पथक ज्वालामुखीपासून एक मैल अंतरापर्यंत जवळ गेले होते. ज्वालामुखीतून पाच-दहा मिनिटे राख बाहेर फेकली जात असल्याचे पथकाला आढळले. त्यानंतर २६ जानेवारीला पुन्हा त्या परिसराला भेट देऊन ज्वालामुखी जागृत झाल्याची खातरजमा करून घेण्यात आली, असेही निवेदनात म्हटले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹सर्व पेमेंट नेटवर्कसाठी आता एकच ‘भारतक्यूआर’ कोड सुरू

आता एकच क्विक रिस्पॉन्स म्हणजेच क्यूआर कोडमधून सर्व प्रकारचे पेमेंट नेटवर्क करता येणार आहे. भारतक्यूआर नावाची ही नवी कोड प्रणाली नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने मास्टर कार्ड आणि व्हिसा यांच्या सहकार्याने विकसित केले आहे. सर्वच प्रकारच्या पेमेंट्ससाठी एकच क्यूआर कोड असण्याचा हा जगातील पहिलाच क्यूआर कोड असेल.

सध्या वेगवेगळया पेमेंट प्रोव्हायडरचे एकाच दुकानात वेगवेगळे क्यूआर कोड असतात. उदा. सध्या पेटीएमचा व एचडीएफसीचाही क्यूआर कोड हा वेगवेगळा आहे. जर एखाद्याकडे पेटीएमचे मोबाइल वॉलेट असेल तर त्याला पेटीएमचा क्यूआरकोड दाखवावा लागतो. तो क्यूआर कोड स्कॅन करून पैसे देता येतात. परंतु, नव्या व्यवस्थेत क्यूआर कोडच्या माध्यमातून पैसे देणे सोपे होणार आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारच्या डिजिटल व्यवस्थेत पाँईट ऑफ सेल (पॉस मशीन) मशीनच गरज नसते. फक्त आपल्याकडे स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. सध्या देशात सुमारे १०० कोटी मोबाइल ग्राहक आहेत. यामध्ये ३५ ते ४० कोटी स्मार्टफोन आहेत.

हा नवा कोड भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्यूटी गर्व्हनर आर. गांधी यांनी सोमवारी सादर केला. नव्या व्यवस्थेत दुकानदाराला वेगवेगळया कोडऐवजी एकच कोड काऊंटरवर ठेवावा लागेल. हा कोड संबंधित बँकेच्या मोबाइल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून मिळू शकतो. इतकंच नव्हे तर नवा कोड इतर देशातही सहजपणे लागू करता येऊ शकतो. विशेष म्हणजे नव्या कोडसाठी दुकानदारांना आपल्या सध्याच्या क्यूआर कोडमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करण्याची गरज भासणार नाही.

क्यूआर कोडने पैसे देणे इतर माध्यमांपेक्षा सुरक्षित मानले जाते. त्याचबरोबर ते अत्यंत किफायतशीरही आहे. यामध्ये फक्त स्कॅन करून पैसे देता येतात. या व्यवस्थेला ‘पुश पेमेंट’ नावानेही ओळखले जाते. यामध्ये पैसे देण्याची प्रक्रिया सुरू करण्याची जबाबदारी व्यापाऱ्याची नव्हे तर ग्राहकांची असते. त्याचबरोबर यामध्ये पिन क्रमांक किंवा वैयक्तिक माहिती देण्याची गरज नसते.

भारतक्यूआरमध्ये बँक खाते, आयएफसी कोड, यूनिफाइड पेमेंट इंटरफेस आणि आधारची माहिती देण्याचीही सुविधा उपलब्ध असेल. यामुळे डिजिटल पेमेंट करणे आणखी सोपे जाणार आहे.

या बँकांमध्ये नवा कोड सुरू होणार:

भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, सिटी यूनियन बँक, डेव्हल्पमेंट क्रेडिट बँक, करूर वैश्य बँक, आरबीएल बँक, विजया बँक, यस बँक याशिवाय लवकरच यामध्ये आणखी काही बँकांचा समावेश होणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹आयपीएलचा लिलाव संपुष्टात आल्यानंतर सर्व संघांची स्थिती कशी आहे. कोणत्या संघाचे पारडे जड आहे? याची चर्चा सुरू झाली आहे.

 आयपीएलमधील संघांचे संपूर्ण खेळाडू पुढीलप्रमाणे-

सन रायझर्स हैदराबाद-

नव्याने दाखल झालेले खेळाडू:
तन्मय अग्रवाल (१० लाख), मोहम्मद नबी (३० लाख), एकलव्य द्विवेदी (७५ लाख), रशीद खान (४ कोटी), प्रवीण तांबे (१० लाख), ख्रिस जॉर्डन (५० लाख), बेन लाफलिंग (३० लाख), मोहम्मद सिराज (२ कोटी ६० लाख)

संघाने कायम ठेवलेले खेळाडू :
शिखर धवन, भुवनेश्वर कुमार, डेव्हिड वॉर्नर, हेन्रीकस, नमन ओझा, रिकी भुइ, केन विल्यमसन, सिद्धार्थ कौल, विपुल शर्मा, आशिष नेहरा, युवराज सिंग, केन कटिंग, अभिमन्यू मिथून, मिस्तफिजूर रेहमान, वरिंन्दर सरण, दीपक हुडा, विजय शंकर.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू-

नव्याने दाखल झालेले खेळाडू :
पवन नेगी (१ कोटी), टायमल मिल्स (१२ कोटी), अनिकेत चौधरी (२ कोटी), प्रवीण दुबे (१० लाख), बिली स्टॅनलेक (३० लाख)

संघाने कायम ठेवलेले खेळाडू :
विराट कोहली, केएल राहुल, एबी डी’व्हिलियर्स, ख्रिस गेल, यजुवेंद्र चहल, हर्षल पटेल, मनदीप सिंग, अॅडम मिलने, सरफराज खान, एस.अरविंद, केदार जाधव, शेन वॉटसन, स्टुअर्ट बिन्नी, सॅम्युअल बद्री, इक्बाल अब्दुल्ला, ट्रावीस हेड, सचिन बेबी, अवेश खान.

रायझिंग पुणे सुपरजाएंट्स-

नव्याने दाखल झालेले खेळाडू :
बेन स्टोक्स (१४.५० कोटी), जयदेव उनाडकट (३० लाख), राहुल चहार (१० लाख), सौरभ कुमार (१० लाख), डॅन ख्रिस्तन (१ कोटी), मिलिंद तंडन (१० लाख), आर.त्रिपाठी (१० लाख), मनोज तिवारी (५० लाख), लॉकी फर्गुसन (५० लाख)

संघाने कायम ठेवलेले खेळाडू : एम.एस.धोनी, अजिंक्य रहाणे, आर.अश्विन, स्टीव्ह स्मिथ, फॅ ड्यु प्लेसिस, मिचेल मार्श, अशोक डिंडा, अंकुश बैन्स, रजत भाटीया, अंकित शर्मा, इश्वर पांडे, अॅडम झम्पा, जसकरन सिंग, बाबा अपराजित, दीपक चहार, उस्मान ख्वाजा, मयांक अग्रवाल.

गुजरात लायन्स-

नव्याने दाखल झालेले खेळाडू :
नथू सिंग (५० लाख), बसिल थंम्पी (८५ लाख), तेजस सिंग बरोका (१० लाख), मनप्रीत गोनी (६० लाख), जेसन रॉय (१ कोटी), मुनाफ पटेल (३० लाख), चिराग सुरू (१० लाख), शेली शौर्या (१० लाख), शुभम अग्रवाल (१० लाख), प्रथम सिंग (१० लाख), आकाशदिप नाथ (१० लाख)

संघात कायम ठेवण्यात आलेले खेळाडू : सुरेश रैना, रवींद्र जडेजा, जेम्स फॉकनर, ब्रँडन मॅक्क्युलम, ड्वेन ब्राव्हो, आरोन फिंच, ड्वेन स्मिथ, दिनेश कार्तिक, धवल कुलकर्णी, प्रवीण कुमार, अँड्र्यू ट्ये, इशान किशन, प्रदीप सांगवान, शिविल कौशिक, शादाब जकाती, जयदेव शहा.

कोलकाता नाईट रायडर्स-

नव्याने दाखल झालेले खेळडू:
ट्रेंट बोल्ट (२ कोटी), ख्रिस वोक्स (४.२० कोटी), रिशी धवन (५५ लाख), गोलंदाज कुलर नाईल (३.५ कोटी), रोवमन पॉवेल (३० लाख), आर.संजय यादव (१० लाख), इशान जग्गी (१९ लाख), डॅरेन पॉवेल (५० लाख), सायन घोष (१० लाख)

संघात कामय ठेवण्यात आलेले खेळाडू :
गौतम गंभीर, सुनील नरेन, कुलदीप यादव, मनिष पांडे, सुर्यकुमार यादव , पीयुष चावला, रॉबीन उथप्पा, शाकिब अल हसन, ख्रिस लायन, उमेश यादव, युसूफ पठाण, शेल्डोन जॅक्सन, अंकित सिंग राजपूत, आंद्रे रसेल

मुंबई इंडियन्स –

नव्याने दाखल झालेले खेळाडू:
निकोल्स पुरन (३० लाख), मिचेल जॉन्सन (२ कोटी), के.गोथम (२ कोटी), कर्ण शर्मा (३.२ कोटी), सौरभ तिवारी (३० लाख), ए.गुनारत्ना (३० लाख), के.खेज्रोलिया (१० लाख)

संघात कायम ठेवण्यात आलेले खेळाडू :
 रोहित शर्मा, केरॉन पोलार्ड, लसिथ मलिंगा, हरभजन सिंग, अंबाती रायुडू, जसप्रीत बुमराह, श्रेयस गोपाल, लेंडेल सिमन्स, विनय कुमार, पार्थिव पटेल, मिचेल मॅक्लिघन, नितिश राणा, सिद्धेश लाड, जे.सुचिथ, हार्दिक पंड्या, जोस बटलर, टीम साऊदी, जेथीश शर्मा, कुणाल पंड्या, दीपक पुनिया.

दिल्ली डेअरडेव्हील्स-

नव्याने दाखल झालेले खेळाडू :
अँजेलो मॅथ्युज (२ कोटी), कोरे अँडरसन (१ कोटी), कगिसो रबाडा (५ कोटी), पॅट कमिन्स (४.५० कोटी), अंकित बावणे (१० कोटी), आदित्य तरे (२५ लाख), मुरूगन अश्विन (१ कोटी), नवदीप सैनी (१० लाख), शशांक सिंग (१० लाख)

संघाने कायम ठेवलेले खेळाडू :
जेपी ड्युमिनी, मोहम्मद शमी, क्विंटन डी कॉक, शहाबाज नदीम, जयंत यादव, अमित मिश्रा, श्रेयस अय्यर, जहीर खान, सॅम बिलिंग्ज, सजू सॅमसन, ख्रिस मॉरिस, कार्सोल ब्रेथवेट, करुण नायर, ऋषभ पंत, सीव्ही मिलिंद, सय्यद अहमद, प्रत्युश सिंग.

किंग्ज इलेव्हन पंजाब-

नव्याने दाखल झालेले खेळाडू :
इऑन मॉर्गन (२ कोटी), राहुल टेवाटिया (२५ लाख), टी.नटराजन (३ कोटी), मॅट हेन्री (५० लाख), वरुण आरोन (२.८० कोटी), मार्टिन गप्तील (५० लाख), डॅरेन सॅमी (३० लाख), रिंकू सिंग (१० लाख)

संघात कायम ठेवण्यात आलेले खेळाडू : डेव्हिड मिलर, मनन वोरा, अक्षर पटेल, ग्लेन मॅक्सवेल, गुरूकिरत सिंग, अनुरित सिंग, संदीप शर्मा, शार्दुल ठाकूर, शॉन मार्श, वृद्धीमान साहा, मुरली विजय, न

िखिल नाईक, मोहित शर्मा, मार्क्युस स्टोनिस, केसी कारिप्पा, अरमान जाफर, प्रदीप साहू, स्वप्निल सिंग, हाशिम आमला.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹प्रदूषणाचे प्रतिमिनिट दोन बळी..

देशातील विदारक स्थिती; ‘लॅन्सेट’ नियतकालिकाचा अहवाल

शुद्ध हवा आणि पाणी.. निरोगी जीवनासाठी आवश्यक असलेल्या या अगदी प्राथमिक आणि निसर्गदत्त बाबी. मात्र, दुर्दैवाने देशात अनेकांच्या नशिबात हेही नसते. त्यामुळेच प्रदूषित हवेमुळे प्रतिमिनिट किमान दोन बळी जात असल्याचे विदारक सत्य उजेडात आले आहे. ‘द लॅन्सेट’ या वैद्यकीय नियतकालिकाने केलेल्या अभ्यासात हे वास्तव आढळून आले असून राजधानी दिल्ली आणि पाटणा ही दोन शहरे अत्यंत प्रदूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘द लॅन्सेट’ या नियतकालिकाने जगभरातील प्रदूषणाबाबत अहवाल जारी केला असला तरी त्याला २०१० सालातील आकडेवारीचा आधार आहे. मात्र, असे असले तरी या अभ्यास अहवालामुळे देशातील प्रदूषणपातळीबाबत पुढे आलेले भीषण वास्तव नजरेआड करता येत नाही. देशातील वायूप्रदूषण एवढय़ा उच्च पातळीवर पोहोचले आहे की, मिनिटाला किमान दोघांचा बळी त्यामुळे जातो तर दरवर्षी दहा लाख भारतीयांचा मृत्यू केवळ प्रदूषित हवेमुळे होतो, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. शिवाय जगात अत्यंत प्रदूषित असलेल्या शहरांच्या यादीत नवी दिल्ली आणि पाटणा या दोन शहरांचाही समावेश आहे. हवामानातील बदल आणि हवेतील वाढते प्रदूषण या दोन्ही बाबी परस्परसंबंधित असून त्यामुळे देशातील हवेच्या प्रदूषणात उत्तरोत्तर वाढ होत असल्याचे निरीक्षण अहवालात मांडण्यात आले आहे.

अहवाल म्हणतो..

उत्तर भारतातील धुक्याचे वाढते प्रमाण धोकादायक

जागतिक बँकेच्या अंदाजानुसार प्रदूषणामुळे भारतीय कामगारांचे ३८ अब्ज डॉलरचे नुकसान

पाटणा व नवी दिल्ली या शहरांच्या हवेत बारीक धुलिकण हृदयासाठी अत्यंत धोकादायक

वायूप्रदूषण हा प्रदूषणाचा प्राणघातक प्रकार. जागतिक अर्थव्यवस्थेत त्यामुळे २२५ अब्ज डॉलरचे नुकसान

२.७ ते ३.४ दशलक्ष जन्म वायुप्रदूषणाशी संलग्न असण्याची शक्यता

जगभरात दररोज १८ हजार बळी एकटय़ा वायूप्रदूषणामुळे जातात. भारतात दरवर्षी दहा लाख बळी

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹‘इंडियन एक्सप्रेस डिजिटल’ची बाजी, डिजिटल माध्यमांमध्ये देशात दुसरा क्रमांक!

इंडियन एक्सप्रेस समूहाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. सर्वाधिक वाचक संख्येच्या बाबतीत ‘इंडियन एक्सप्रेस डिजिटल’ कंपनी भारतातील द्वितीय क्रमांकाची कंपनी ठरलीये. इंडियन एक्सप्रेस, जनसत्ता, फायनान्शियल एक्स्प्रेस आणि लोकसत्ता या वृत्तपत्रांच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या इंडियन एक्सप्रेस समूहाने ऑनलाइन विश्वात जोरदार मुंसडी मारली आहे. वृत्तपत्राबरोबरच या समूहाच्या प्रकाशनांच्या ऑनलाइन वाचकांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे डिसेंबर २०१६ मधील ‘कॉमस्कोअर’च्या अहवालात म्हटले आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’ समूहाच्या ऑनलाइन वाचकांची संख्या तिपटीने वाढली असल्याचे ‘कॉमस्कोअर’ने म्हटले आहे. एक्सप्रेस समूहाची ‘लोकसत्ता डॉट कॉम’ ही वेबसाइट सलग पाच महिने मराठी ऑनलाईन विश्वातील पहिल्या क्रमांकाची न्यूज वेबसाइट ठरली आहे. व्यापार आणि वाणिज्य या प्रकारात फायनान्शियल एक्स्प्रेस वेबसाइट दुसऱ्या क्रमांकाची वेबसाइट ठरली आहे. ‘जनसत्ता डॉट कॉम’ ही वेबसाइट सर्वाधिक वेगाने वाढणारी हिंदी न्यूज वेबसाइट ठरली आहे.

मोबाइल, डेस्कटॉप या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर ‘इंडियन एक्सप्रेस’ डिजिटलची कामगिरी सरस ठरली आहे. भारतातील प्रथम क्रमांकाची न्यूज वेबसाइट ‘टाइम्स ऑफ इंडिया’ ठरली आहे. त्या पाठोपाठ ‘इंडियन एक्सप्रेस’ आहे. पेजव्ह्यूजच्या बाबतीत ‘इंडियन एक्सप्रेस’ दुसऱ्या क्रमांकाची वेबसाइट असली तरी सर्वाधिक झपाट्याने वाढणारी वेबसाइट म्हणून या वेबसाइटची नोंद करण्यात आली आहे. सोशल मीडियावर जास्तीत जास्त वाचकांना आकर्षित करण्यामध्ये तसेच त्यांना गुंतवून ठेवण्यामध्ये ‘इंडियन एक्सप्रेस’ वेबसाइट जगात २३ व्या क्रमांकाची वेबसाइट ठरल्याचे ‘न्यूजव्हीप’ने म्हटले आहे. या यादीत समाविष्ट असलेली इंडियन एक्सप्रेस ही एकमेव न्यूज वेबसाइट आहे. तसेच ती एकमेव भारतीय वेबसाइट असल्याचे देखील न्यूजव्हीपने म्हटले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹‘तारिणी’ 18 फेब्रुवारीत होणार भारतीय नौदलात सामील

भारतीय नौदलाची आयएनएसव्ही तारिणी ही दुसरी शीडनौका उद्या आयएनएस मांडोवी इथं नौदल प्रमुख सुनील लांबा यांच्या उपस्थितीत नौदलाच्या सेवेत दाखल होणार आहे.

आयएनएसव्ही तारिणीमधून भारतीय सर्व महिला खलाशी असणारा भारतीय नौदलाचा पहिला चमू जागतिक सागर परिक्रमा करणार आहे. तारिणीवर सहा शिडे असून तिची डोलकाठी 25 मीटर उंच आहे. या नौकेवर अद्ययावत संपर्क सुविधा बसवण्यात आली असून याद्वारे जगात कुठेही संपर्क स्थापित करता येईल.

या नौकेचे नांव ओदिशातल्या गंजाम जिल्ह्यातल्या विख्यात तारा-तारिणी देवालयाच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे. संस्कृतमध्ये तारिणी या शब्दाचा अर्थ नौका अजून तारा-तारिणी ही खलाशी आणि व्यापाऱ्यांची आश्रय देवता आहे.

लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी या नौकेच्या कप्तान असून लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, लेफ्टनंट ऐश्वर्या बोडापती, लेफ्टनंट परापल्ली स्वाती, लेफ्टनंट विजया देवी, लेफ्टनंट पायल गुप्ता हा चमू सागर परिक्रमा करणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारतीय "आयटी' क्षेत्रास युरोपचे निमंत्रण

अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाद्वारे एच वन बी व्हिसासंदर्भात कडक धोरण अवलंबिले जाण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर भारतीय सरकार चिंतीत असताना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या भारतीयांना अधिक संख्येने सामावून घेण्याचे सकारात्मक संकेत युरोपिअन युनियनने दिले आहेत.

जागतिक व्यापारासंदर्भात कोणत्याही स्वरुपाच्या "प्रोटेक्शनिज्म' धोरणाचा अंगीकार केला जाणार नाही, असे स्पष्ट संकेत इयुने यावेळी दिले. युरोपिअन संसदेमधील परराष्ट्र व्यवहार समितीचे शिष्टमंडळ सध्या भारताच्या दौऱ्यावर आल्ले आहेत. यावेळी त्यांनी यासंदर्भातील इयुची भूमिका स्पष्ट केली.

इयु व भारतामध्ये प्रस्तावित असलेला संवेदनशील "व्यापार व गुंतवणूक करार' हा मोठ्या काळासाठी प्रलंबित राहिला आहे. या करारासंदर्भात पुन्हा बोलणी सुरु करण्यास दोन्ही बाजुंना आलेल्या अपयशासंदर्भात इयुकडून यावेळी "चिंता' व्यक्त करण्यात आली आहे. याचबरोबर, या करारामध्ये इयु व भारतामधील सध्याच्या व्यापाराची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर वाढविण्याची क्षमता असल्याचे सांगत शिष्टमंडळातर्फे यावेळी यासंदर्भातील चर्चा लवकर सुरु करण्याचे आवाहन भारतीय नेतृत्वास करण्यात आले. या करारावर 2013 नंतर चर्चा झालेली नाही.

अमेरिकेमधील सध्या वाहत असलेल्या खुल्या अर्थव्यवस्थेविरोधी वाऱ्यांमुळे युरोपीय नेतृत्वामध्येही चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर, युरोप हा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कुशल कामगार असलेल्या भारतीयांना अधिक संख्येने सामावून घेण्यास तयार असल्याचे या शिष्टमंडळाचे नेतृत्व करत असलेल्या डेव्हिड मॅकऍलिस्टर यांनी स्पष्ट केले. ""भारतीय नागरिक हे कुशल आहेत. युरोपिअन युनियनमधील माहिती तंत्रज्ञान क्षेत्र हे कुशल भारतीयांशिवाय यशस्वी ठरले नसते,'' असे मॅकऍलिस्टर म्हणाले.

हे शिष्टमंडळ मुख्यत्वे भारतीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल, नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पांगरिया व लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची भेट घेणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारत जगातील सर्वाधिक शस्त्र आयात करणारा देश

मागील पाच वर्षांमध्ये जगभरात शस्त्र व्यापारात मोठी वाढ झाली असून, प्रमुख शस्त्र आयातदारांच्या यादीत भारत प्रथम क्रमांकावर आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

2012 ते 2016 या कालावधीत झालेल्या शस्त्र आयातीमध्ये एकट्या भारताचा वाटा 13 टक्के होता. भारतानंतर सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, चीन आणि अल्जेरिया या देशांचा क्रमांक लागतो. 2007 ते 2011 या काळातही या यादीत भारतच प्रथम क्रमांकावर होता. त्या वेळी एकूण शस्त्र आयातीमध्ये भारताचा वाटा 9.7 टक्के होता.

बहुतेक आखाती देश येमेन, सीरिया आणि इराकमधील संघर्षामध्ये गुंतले असल्याने त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र आयात केली जाते. तसेच आपापसातील संघर्षामुळेही कायम शस्त्रसज्ज राहण्याकडे त्यांचा कल असतो. गेल्या पाच वर्षांमध्ये सौदी अरेबियाच्या शस्त्र आयातीमध्ये तब्बल 212 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकूण आयातीमध्ये त्यांचा वाटा 8.2 टक्के आहे.

चीन आणि पाकिस्तान या अण्वस्त्रधारी देशांबरोबर तणावाचे संबंध असल्याने भारतानेही आपली लष्करी ताकद वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत. चीनचा आक्रमकपणा वाढत असताना आणि त्यांनी पाकिस्तानमध्ये अब्जावधी डॉलरची गुंतवणूक केली असताना भारतालाही अमेरिकेबरोबरील संरक्षण संबंध अधिक मजबूत करणे महत्त्वाचे वाटले आहे. शस्त्र आयात करण्यापेक्षा स्थानिक पातळीवरच "मेक इन इंडिया' अंतर्गत शस्त्रनिर्मितीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असला, तरी लष्कराच्या गरजा तातडीने पुरविण्याची स्थानिक बाजारामध्ये तूर्त क्षमता नाही. त्यामुळे अत्याधुनिक शस्त्रांच्या गरजांसाठी भारताला अजूनही आयातीवर भर द्यावा लागत आहे.

250 अब्ज डॉलर खर्च करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराचे आधुनिकीकरण करण्यासाठी 250 अब्ज डॉलर खर्च करण्याचा निश्चय केला असून, यामध्ये लढाऊ विमानांपासून पाणबुड्यांपर्यंत सगळीकडे सुधारणा केली जाणार आहे. यासाठी विविध परदेशी कंपन्यांशी करार करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले जाते. यामुळे भारताची अमेरिका, रशिया आणि इस्राईलकडून आयात वाढली आहे. चीनला मात्र स्थानिक पातळीवर शस्त्रनिर्मिती करण्यात बऱ्यापैकी यश येत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹आसाराम लोमटे यांना अकादमी पुरस्कार प्रदान

ग्रामीण शैलीच्या लिखाणासाठी प्रसिद्ध असलेले लेखक व पत्रकार आसाराम लोमटे यांना त्यांच्या ‘आलोक’ या लघुकथा संग्रहासाठी २०१६ चा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. येथील कमानी सभागृहात 'साहित्य अकादमी २०१६' च्या पुरस्कार सोहळयाचे आज आयोजन करण्यात आले होते. शास्त्रज्ञ जयंत नारळीकर, साहित्य अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी, साहित्य अकादमीचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कंबार, सचिव के. श्रीनिवासराव तसेच साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मंचावर उपस्थित होते.

आसाराम लोमटे यांना त्यांच्या ‘आलोक’ या ‘लघुकथा’ साहित्यासाठी मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून साहित्य अकादमी पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले. ‘आलोक’ या लघुकथेमध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनशैली मांडली आहे. ग्रामीण भागातील जीवनशैलीमध्ये आलेले व्यापक परिवर्तन हे सशक्त तसेच वस्तुनिष्ठरीत्या ‘आलोक’मध्ये प्रस्तुत केलेले आहे. यामध्ये गावातील लोकभाषा, स्थानिक परपंरा अतिशय अलगदपणे मांडली आहे. यासह ग्रामीण लोकांना येणाऱ्या जटीलतेविषयीही सांगण्यात आले आहे.

आसाराम लोमटे यांचा जन्म महाराष्ट्रातील गुगळी धमनगांव येथे झाला. मराठी साहित्यात त्यांनी डॉक्टरेट केले आहे. लोमटे यांचे ‘इडा पिडा टळो’, ‘आलोक’, ‘धूळपेर’ हे तीन लघुकथा संग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या लिहिलेल्या कथा या पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ आणि स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील अभ्यासक्रमात आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹सुरक्षा सल्लागारपदी हर्बर्ट मॅकमास्टर

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदावर हर्बर्ट रेमंड मॅकमास्टर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लेफ्टनंट मायकेल फ्लाइन यांना गेल्या महिन्यात राजीनामा देण्यास भाग पाडल्यावर २४ दिवसांनी मॅकमास्टर यांची नियुक्ती केल्याचे जाहीर करण्यात आले. सध्या ‘आर्मी केपेबिलिटीज इंटीग्रेशन सेंटर’चे प्रमुख आहेत. त्यांनी यापूर्वी जर्मनी, नैर्ऋत्य आशिया आणि ‌इराकमध्ये काम केले आहे. ‘मॅकमास्टर हे अत्यंत गुणवान असून, त्यांचा अनुभवही दांडगा आहे,’ असे गौरवोद्गार ट्रम्प यांनी घोषणा करताना काढले आहेत. दरम्यान, अमेरिकी जनतेच्या विकासासाठी आणि हितांच्या रक्षणासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, असे मॅकमास्टर यांनी म्हटले आहे. सन २००७मध्ये इराकमधील अमेरिका व संयुक्त फौजांचे कमांडरपदही भूषविले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹पृथ्वीसारख्या सात नव्या ग्रहांचा शोध
 पृथ्वीच्या आकाराएवढ्या सात ग्रहांचा शोध लावण्यात खगोलशास्त्रज्ञांना यश आले आहे. या ग्रहांवर जीवसृष्टी अस्तित्वात असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. हे ग्रह पृथ्वीपासून ४० प्रकाशवर्ष दूर आहेत. नासानेदेखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

आपल्या सुर्यमालेबाहेर एवढे ग्रह सापडणे ही दुर्मिळ बाब असल्याचे खगोलशास्त्रज्ञ मायकल गिलॉन यांनी म्हटले. या ग्रहांवर जीवसृष्टी असण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे त्यांनी म्हटले. या सात ग्रहांपैकी तीन ग्रहांवर समुद्र असण्याची शक्यता आहे. हे सात एक्सोप्लॅनेट ग्रह 'ट्रॅप्पीस्ट-१' या ताऱ्याभोवती फिरताना आढळले आहेत. या ताऱ्याचे तापमान थंड असून त्याचे आकारमान सुर्यापेक्षा कमी असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. शास्त्रज्ञांकडून या ग्रहांच्या वातावरणाचा अभ्यास करण्यात येणार आहे. या अभ्यासानंतर या ग्रहांवरील जीवसृष्टीबाबत अधिक माहिती उपलब्ध होईल.

सात ग्रहांवरील वातावरणात ऑक्सिजन आहे का, असल्यास त्याचे प्रमाण किती याचाही शास्त्रज्ञ अभ्यास करणार आहेत. ऑक्सिजन असल्यास जीवसृष्टी असण्याच्या शक्यतेला बळ मिळणार आहे. हे ग्रह एकमेकांपासून खुपच जवळ आहेत. ज्याप्रमाणे आपण चंद्र पाहू शकतो. तसेच हे ग्रहदेखील दिसू शकतात. पहिल्यांदाच पृथ्वी एवढ्या आकाराचे ग्रह सापडले आहेत. विशेष म्हणजे हे खडकाळ ग्रह आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹दहशतवाद्यांचे ड्रोन नष्ट करण्यासाठी फ्रान्सची गरुड सेना

दहशतवाद्यांचे ड्रोन नष्ट करण्यासाठी फ्रान्सने गरुडांना प्रशिक्षण दिले आहे. गेल्या वर्षभरात फ्रान्सच्या लष्कराने प्रशिक्षित केलेल्या चार गरुडांच्या पथकाने दहशतवाद्यांचे ड्रोन नष्ट केले आहेत. अर्टाग्नन, अथोस, पोर्थोस आणि अरामीस या चार गरुडांनी मागील उन्हाळ्यात दहशतवाद्यांची ड्रोन नष्ट केली आहेत. दहशतवाद्यांची ड्रोन्स उद्ध्वस्त करुन कामगिरी यशस्वी केल्यावर प्रशिक्षित गरुडांना त्यांनी आकाशातून जमिनीवर पाडलेल्या ड्रोन्सवरच मांस दिले जाते. गरुडांची सेना ड्रोनवर मिळालेल्या मांसावर यथेच्छ ताव मारते.

प्रशिक्षण दिलेले गरुडांचे पथक जेव्हा आकाशात झेपावते, तेव्हा फ्रान्सच्या लष्कराकडून संपूर्ण मोहिमेवर नियंत्रण मनोऱ्यातून लक्ष ठेवण्यात येते, अशी माहिती एएफपी या वृत्तसंस्थेने दिली आहे. प्रशिक्षित करण्यात आलेले गरुडांचे पथक २० सेकंदांमध्ये २०० मीटर अंतर कापते. यानंतर आकाशात उंच भरारी घेत ड्रोनवर झडप मारुन दहशतवाद्यांचे इरादे धुळीस मिळवतात. ‘गरुडांची प्रगती योग्य दिशेने सुरू आहे,’ असे फ्रान्स हवाई दलाच्या कमांडरने सांगितले आहे. फ्रान्सच्या हवाई दलाकडून गरुडांच्या सर्व मोहिमांवर बारिक लक्ष ठेवले जाते.

आठवड्याभरापूर्वी इराणच्या सैन्याने आकाशात जोरदार गोळीबार केला होता. ड्रोनच्या मदतीने आकाशातून बॉम्ब टाकला गेल्यानंतर इराणच्या सैन्याकडून आकाशात अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. दहशतवाद्यांकडून सध्या विविध प्रकारची शस्त्रास्त्रे विकसित केली जात आहेत. यामध्ये लहान मुलांच्या खेळण्यांच्या दुकानात उपलब्ध होऊ शकतील, अशा शस्त्रास्त्रांवर दहशतवाद्यांकडून काम सुरू आहे. यासोबतच रेडिओच्या माध्यमातून शत्रूवर नजर ठेवता येईल, अशी यंत्रणादेखील दहशतवाद्यांकडून निर्माण केली जाते आहे, असे वृत्त असोशिएट प्रेस या वृत्तसंस्थेने दिले आहे.

फ्रान्सचे अध्यक्ष राहात असलेल्या निवासस्थानावर आणि लष्करी तळांवर २०१५ सालच्या सुरुवातीला ड्रोन उडताना आढळले होते. त्यावेळी कोणालाही इजा झाली नाही. मात्र यानंतर मागील वर्षी पॅरिसमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर फ्रान्सच्या लष्कराने प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आकाशात उडणारे ड्रोन टिपणे आणि त्यातही ते जास्त लोकसंख्या असलेल्या भागात टिपणे कठीण असते. त्यामुळे फ्रान्सच्या लष्कराने यासाठी गरुडांना विशेष प्रशिक्षण दिले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹सामान्य लोकांसाठी नवी ‘अंत्योदय एक्स्प्रेस’ सुरू

एरवी रेल्वेगाडीतील अनारक्षित सामान्य श्रेणीचा डबा म्हणजे तुटलेले बाक, नादुरुस्त पंखे, मिणमिणत्या प्रकाशाचे दिवे असे चित्र असते. मात्र आता कुशनयुक्त खुच्र्या, अॅल्युमिनियमचे कंपोझिट पॅनल व एलईडी दिवे यांनी युक्त असलेली ‘अंत्योदय एक्स्प्रेस’ ही सामान्य लोकांसाठी असलेली नवी संपूर्णपणे अनारक्षित गाडी सुरू होत असून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी बुधवारी तिचे अनावरण केले.

खास करून तयार करण्यात आलेले रंगीत डबे असलेली ही गाडी वर्दळीच्या मार्गावर चालवली जाणार आहे. पहिली अंत्योदय एक्स्प्रेस मुंबई ते टाटानगर आणि दुसरी गाडी एर्नाकुलम व हावडादरम्यान धावणार आहे.

चार प्रकारच्या नव्या प्रवासी गाडय़ा सुरू करण्याची घोषणा आम्ही रेल्वे अर्थसंकल्पात केली होती. यापैकी हमसफर एक्स्प्रेस सुरू झाली असून आता अंत्योदय सुरू होत आहे, असे नव्या रंगसंगतीसह तयार झालेल्या नव्या सामान्य श्रेणींच्या डब्यांची पाहणी केल्यानंतर प्रभू यांनी सांगितले. या डब्यांमध्ये वॉटर प्युरिफायर, मोबाइल फोनसाठी चार्जिग पॉइंट्स आणि अग्निशमन उपकरणे यांसारख्या अनेक सोयी आहेत. ‘अंत्योदय’ ही ‘आम आदमी’करिता (सामान्य माणूस) असलेली गाडी आहे. तिच्या डब्यांमध्ये देण्यात आलेल्या सोयी प्रथम श्रेणीच्या डब्यासारख्या आहेत. सामान्य माणूस हा आमच्या सरकारचा केंद्रबिंदू असल्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी अनेक सोयींनी युक्त अशी ही गाडी सुरू केली, असे प्रभू म्हणाले.

अंत्योदय एक्स्प्रेसच्या भाडेरचनेबद्दल विचारले असता, त्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल असे रेल्वेमंत्री म्हणाले; तथापि या नव्या अनारक्षित गाडीचे भाडे मेल/एक्स्प्रेस गाडय़ांपेक्षा जास्त राहण्याची शक्यता असल्याचे कळते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹‘टेस्ट टय़ूब बेबी’ पद्धतीचा वापर ‘कायदेशीर व न्यायसंगत’

अपत्यप्राप्तीसाठी ‘टेस्ट टय़ूब बेबी’ पद्धतीचा वापर करणे हे ‘कायदेशीर व न्यायसंगत’ असल्याचा निर्णय पाकिस्तानच्या शरियत न्यायालयाने दिला असून, त्यामुळे वैद्यकीय गुंतागुंतीच्या कारणाने अपत्यसुखापासून वंचित असलेल्या देशातील दांपत्यांना दिलासा मिळाला आहे.

जर वडिलांकडून शुक्राणू आणि आईकडून बीजांड गोळा करून त्यांचे वैद्यकीय प्रक्रियेद्वारे परीक्षानलिकेत फलन करण्यात आले आणि त्यातून तयार झालेला गर्भ वास्तविक आईच्या गर्भाशयात स्थापित करण्यात आला, तर ही प्रक्रिया ‘कायदेशीर व न्यायसंगत’ आहे, असा निर्णय संघराज्य शरियत न्यायालयाने मंगळवारी दिला.

ही प्रक्रिया बेकायदेशीर किंवा पवित्र कुराण किंवा सुन्ना यांच्या शिकवणीच्या विरोधात असल्याचे म्हटले जाऊ शकत नाही, असे बीजांड व शुक्राणूंच्या कृत्रिम संयोगाबाबत (इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन- आयव्हीएफ) दिलेल्या २२ पानी निकालात न्यायालयाने सांगितल्याचे वृत्त ‘डॉन’ वृत्तपत्राने दिले आहे.

ही प्रक्रिया वैध असण्याचे कारण, शुक्राणू व बीजांड हे वास्तविक वडील व आईचे आहेत. या दांपत्याने निर्धारित वैद्यकीय प्रक्रियेचा अवलंब करायचे ठरवले, तर कायदेशीर मुलाच्या जन्माच्या संदर्भात कुठलाही प्रश्न उपस्थित करता येऊ शकत नाही. अशा प्रकारे जन्माला आलेले मूल हे सर्व प्रकारे कायदेशीर व औरस राहील, असे न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले.

तथापि टेस्ट टय़ूब बेबी मिळवण्यासाठी इतर कुठलीही अट ही गैरइस्लामिक राहील. पैशांसाठी किंवा इतर कारणासाठी एखादी महिला ‘सरोगेट मदर’ होण्यास राजी होत असेल, तर ही संपूर्ण प्रक्रिया तसेच त्यातून होणारा मुलाचा जन्म हा बेकायदेशीर ठरेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारत-रवांडा यांच्यात 3 करारांवर स्वाक्षऱ्या

उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या रवांडा दौऱयादरम्यान दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय संबंधांना बळकटी प्रदान करण्यासाठी भारत-रवांडा यांच्यात 3 करारांवर स्वाक्षऱया झाल्या. दोन्ही देशांनी संशोधन, उड्डाण क्षेत्र तसेच व्हिसाविषयक तीन सहमती पत्रांवर स्वाक्षरी केली.

संशोधनाच्या क्षेत्रात दोन्ही देश किगालीमध्ये एक उद्योजकता विकास केंद्राची स्थापना करतील. तर उड्डाण क्षेत्रात रवांडा एअर आगामी काही महिन्यांमध्ये भारतासाठी सेवा सुरू करणार आहे. दोन्ही देश राजनैतिक तसेच अधिकृत पासपोर्टधारकांना व्हिसाकरता सवलती देणार आहेत.

या करारांमुळे आर्थिक तसेच व्यापारी संबंधांना प्रोत्साहन मिळेल. रवांडा आणि भारत यांच्यात 54 वर्षांचे महत्त्वपूर्ण द्विपक्षीय संबंध आहेत आणि आम्ही हे संबंध मजबूत बनविण्यासाठी प्रतिबद्ध असल्याचे रवांडाचे पंतप्रधान अनस्तासे मुरेकेजी यांनी म्हटले. उपराष्ट्रपती अन्सारी हे रवांडा आणि युगांडाच्या 5 दिवसीय दौऱयावर आहेत. अंसारी यांच्यासोबत अधिकाऱयांचे 27 सदस्यीय शिष्टमंडळ देखील गेले आहे. भारताने मागील काही काळापासून आफ्रीका खंडावर विशेष भर दिला आहे. यानुसार पंतप्रधान, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींनी या खंडातील अनेक देशांना भेटी दिल्या आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹चार देशांतील १४ लाख मुले तीव्र कुपोषणग्रस्त

नायजेरिया, सोमालिया, दक्षिण सुदान आणि येमेन या देशांतील १४ लाख मुले तीव्र कुपोषणग्रस्त असून त्यातील अनेक मुलांचा या वर्षी मृत्यू होण्याची शक्यता युनिसेफने वर्तविली आहे.

येमेनमध्ये मागील दोन वर्षांपासून युद्धपरिस्थिती आहे. त्यामुळे येथील चार लाख ६२ हजार मुले कुपोषित आहेत. तर ईशान्य नायजेरियातील साडेचार लाख मुले कुपोषित असल्याची माहिती युनिसेफने दिली आहे. येथील कुपोषणाबाबत संबंधित यंत्रणेला ताकीद देण्यात आली आहे. नायजेरियातील काही दुर्गम भाग मागील वर्षांपासून कुपोषणाने प्रभावित आहे. या भागात मदत करणाऱ्या संस्थांना पोहोचणे अशक्य असल्यामुळे येथील समस्येत भर पडल्याचेही युनिसेफने स्पष्ट केले.

सोमालियातील दुष्काळामुळे येथील एक लाख ८५ हजार मुले कुपोषणाने ग्रस्त आहेत. ही परिस्थिती आणखी भीषण झाली असून कुपोषित मुलांची संख्या आगामी काही महिन्यांत दोन लाख ७० हजारांपर्यंत वाढण्याची शक्यता असल्याचे युनिसेफने सांगितले. दक्षिण सुदानमध्ये दोन लाख ७० हजार मुलांची उपासमार होत आहे. युनिसेफचे अध्यक्ष अँथनी लेक यांनी याबाबत चिंता व्यक्त केली असून तातडीने उपाययोजना केल्यास असंख्य जणांचे प्राण वाचविणे शक्य असल्याचे ते म्हणाले. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा कौन्सिलचे राजदूत पुढील महिन्यात उत्तर नायजेरिया, कॅमेरून, चाद आणि निजर या भागात प्रवास करणार आहेत. बोको हराम या दहशतवादी संघटनेशी सुरू असलेल्या वादामुळे या भागात कुपोषणाची समस्या तीव्र होत असून या मुद्दय़ाकडे जागतिक समुदायाचे लक्ष वेधून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹प्रदूषणाचा भस्मासुर !

राज्यातील शहरांमध्ये भयावह स्थिती; वरवरच्या मलमपट्टीने समस्या गंभीर

देशातील ९४ प्रदूषित शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील सर्वाधिक १७ शहरांचा समावेश आहे. प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला असताना ही आकडेवारी महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंताजनक आहे. चंद्रपूरसारख्या शहरातील प्रदूषणाचा प्रश्न वर्षांनुवर्षे चर्चेत आहे. एखादा अहवाल आल्यावर आठवडाभर चर्चा होते, उपाय योजण्याचे आश्वासन राज्यकर्ते आणि प्रशासनाकडून दिले जाते. थातूरमातूर उपाय योजले जातात. त्यातून प्रश्न सुटत नाही. वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारतीय ग्राहकांसाठी ‘स्काइप लाइट’ची घोषणा; मायक्रोसॉफ्ट क्लाऊड आता स्टेट बँकेसाठीही!

डिजिटल परिवर्तनाला मायक्रोसॉफ्टचे योगदान

मध्यम आणि लघु उद्योग तसेच सरकारी कामकाजांमध्ये डिजिटल परिवर्तन घडवून आणण्यासाठी मायक्रोसॉफ्टने विशेष कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमांतर्गत कंपन्यांच्या समस्यांपासून ते सामाजिक समस्यांपर्यंत सर्वावर तंत्रज्ञानाने उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे करत असतानाच सामान्य वापरकर्त्यांसाठी टूजीवर चालणारी व आधारशी जोडणारी ‘स्काइप लाइट’ ही स्काइप अॅपची नवी आवृत्ती बाजारात आणली आहे.

आंध्रप्रदेश, पंजाब, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडूमधील विविध सरकारी विभाग तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया, फ्लिपकार्ट, टाटा मोटर्स आता मायक्रोसॉफ्टचा क्लाऊड आणि मोबाइल तंत्रज्ञान वापरत आहेत. या तंत्रज्ञानाच्या मदतीने कर्मचाऱ्यांचे सक्षमीकरण, ग्राहकांना अधिकाधिक आकर्षून घेणे, प्रक्रिया अधिक उत्पादनक्षम बनवणे आणि उत्पादने तसेच सेवांमध्ये आमूलाग्र बदल घडणार आहे. मायक्रोसॉफ्टने मुंबईत आयोजित केलेल्या ‘फ्युचर डिकोडेड’ या कार्यक्रमात बुधवारी कंपनीचे मुख्याधिकारी सत्या नाडेला यांनी आपल्या भाषणात भारतात डिजिटल परिवर्तन कसे घडविले जाणार आहे याबाबत विचार मांडले. प्रत्येकाला तंत्रज्ञान सक्षम करण्याचे कंपनीचे उद्दीष्टय़ असून या दृष्टीने विविध कंपन्यांच्या सहकार्याने नवीन तंत्रज्ञान लोकांसाठी खुले करून दिले जात आहे. भारतीय नवउद्यमींमध्ये प्रचंड उत्साह आणि कल्पना आहेत. त्यांचा उद्योग अधिक सक्षम करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट व्यासपीठ उपलब्ध करून देणार असल्याचे नाडेला यांनी नमूद केले.

स्काइप लाइटची घोषणा

स्काइप लाइट हे कमी बँडविड्थवर काम करणारे जलद आणि इंटिग्रेटेड कम्युनिकेशन्स अॅप, खास भारतासाठी डिझाइन करण्यात आले आहे. या अॅपमध्ये आपल्याला मोबाइलमधील कॉल डायलर, लघुसंदेश, स्काइप डायलर या सर्व गोष्टी एकत्रितच पाहता येणार आहे. मोबाइल डेटा आणि वाय-फायच्यामाध्यमातून अॅपचा वापर किती झाला आहे याचा तपशीलही या अॅपमध्ये दिसणार आहे. तसेच आपल्याशी संवाद साधण्यासाठी यामध्ये विविध बॉट्स देण्यात आले आहेत. या बॉट्सच्या माध्यमातून लोकांना विविध विषयांची माहिती मिळू शकणार आहे. तर बॉटसोबत गप्पाही मारता येणार आहे. हे नवीन अॅप डाऊनलोडसाठी उपलब्ध करून देण्यात आले असून त्याची आधारशी संलग्नता जून २०१७पर्यंत पूर्ण होणार आहे. अनोळखी व्यक्तीची ओळख पटवून घेण्यासाठी आधार सेवेचा फायदा होणार असल्याचे नाडेला यांनी नमूद केले. हे अॅप गुजराती, बंगाली, िहदी, मराठी, तामीळ, तेलुगू आणि उर्दू या भाषांमध्ये उपलब्ध आहे.

‘प्रोजेक्ट संगम’ अॅप

लिंक्डइन या अॅपची लाइट आवृत्ती म्हणजे प्रोजेक्ट संगम होय. यामध्ये कुशल कामगारांना नोकरी मिळण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच ऑनलाइन आणि ऑफलाइन शिक्षणही यामध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. िलक्डइनच्या रोजगार शोधक व्यासपीठाच्या शक्तीचा वापर करत कौशल्य विकास कार्यक्रमांना थेटपणे संबंधिक रोजगारांशी जोडणं हे या उपक्रमाचं ध्येय आहे. प्रोजेक्ट संगम हे यूजरना त्यांच्या ‘आधार’ ओळखीचा वापर करत नोंदणी करता येणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹रशिया बनला कच्च्या तेलाचा सर्वात मोठा उत्पादक देश

डिसेंबर 2016 मध्ये रशिया कच्च्या तेलाचा सर्वात मोठा उत्पादक देश बनला आहे. सौदी अरेबियाला मागे टाकून त्याने हे स्थान मिळविले आहे. रशिया आणि सौदी समवेत अनेक तेल उत्पादक देश नोव्हेंबर 2016 मध्ये तेल उत्पादनाची मर्यादा कमी करण्यावर सहमत झाले होते.
डिसेंबर महिन्यात रशियाने प्रतिदिन 10.49 दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाचे उत्पादन केले. नोव्हेंबरच्या तुलनेत हे प्रमाण प्रतिदिन 29000 बॅरलने कमी होते. सौदी अरेबिया नोव्हेंबरमध्ये प्रतिदिन 10.72 दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाचा पुरवठा करत होता, तर डिसेंबरमध्ये हे प्रमाण कमी करत 10.46 दशलक्ष बॅरलवर आणले गेले.

वेबसाइट ऑफ जॉइंट ऑर्गनायजेशन्स डाटा इनिशटिव्हद्वारे जारी करण्यात आलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. मार्च 2016 पासून पहिल्यांदाच रशियाने कच्च्या तेलाच्या उत्पादनात सौदीवर आघाडी घेतली आहे. पेट्रोलियम निर्यातदार देशांनी नोव्हेंबरमध्ये जानेवारी 2017 पासून आगामी 6 महिन्यांपर्यंत तेल उत्पादन घटविण्याचा निर्णय घेतला होता. सौदीने या प्रस्तावावर अधिक जोर दिला होता.

रशियासहित असे उत्पादक देश जे या समूहाचे सदस्य नाहीत, त्यांनी देखील या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. या प्रस्तावामुळेच नोव्हेंबर अखेरपासून आतापर्यंत कच्च्या तेलाच्या किमती 20 टक्क्यांनी वाढल्या आहेत. अमेरिका कच्च्या तेलाच्या उत्पादकांमध्ये तिसऱया स्थानावर आहे. नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत प्रतिदिन 8.9 दशलक्ष बॅरल कच्चे तेलाचे उत्पादन होत होते. तर डिसेंबरमध्ये त्याने हे प्रमाण कमी करत 8.8 दशलक्ष बॅरलवर आणले आहे. सौदीची कच्च्या तेलाची निर्यात कमी होत प्रतिदिन 80 लाख बॅरलवर आली आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹अनेक भाषा विलुप्त होण्याच्या मार्गावर

56 वर्षांपूर्वी 1100 पेक्षा अधिक होत्या भाषा, आता केवळ 880 शिल्लक


भारतच नव्हे तर जगात इंग्रजी आणि काही इतर भाषांच्या वाढत्या वर्चस्वामुळे मातृभाषा आणि बोलीभाषांची कक्षा आकुंचित होत चालली आहे. मातृभाषेत शिक्षण दिल्याने मुले वेगाने शिकतात असे अनेक भाषातज्ञ आणि शिक्षणतज्ञांनी सिद्ध केले असताना ही धक्कादायक स्थिती उद्भवली आहे.

मातृभाषा आणि बोलीभाषा भारतातच नव्हे तर जगात देखील कमी होत आहेत ही चिंतेची बाब आहे. जागतिकीकरणाचा एक मोठा प्रभाव भाषांवर देखील पडल्याचे जेएनयूतील भाषातज्ञ डॉ. गंगा सहाय मीणा यांनी म्हटले. मागील 5 दशकात भारतात बोलल्या जाणाऱया 220 पेक्षा अधिक बोलीभाषा लुप्त झाल्या आहेत. 1961 च्या जनगणनेनुसार भारतात 1100 पेक्षा अधिक भाषा होत्या, ज्यांची संख्या आता 880 पेक्षाही कमी राहिल्याचे वडोदराच्या भाषा संशोधन आणि प्रकाशन केंद्राच्या सर्वेक्षणातून उघड झाले आहे.

विदारक स्थिती

युनेस्कोद्वारे बनविण्यात आलेल्या इंटरेक्टिव्ह ऍटलासमध्ये जगाच्या जवळपास 6 हजार भाषांपैकी 2471 भाषा संकटात आहेत. या मानचित्रावळीनसार भारताच्या एकूण 197 भाषा आणि बोलीभाषा संकटात आहेत. यातील 81 भाषा लुप्त होण्याच्या वाटेवर आहेत. 63 भाषांवर लुप्त होण्याचा गंभीर धोका आहे. 42 भाषा लुप्तप्राय असून 5 भाषा अलिकडेच लुप्त झाल्या आहेत.

देशी भाषांना मिळावे प्राधान्य
ज्या भाषा अलिकडेच लुप्त झाल्या आहेत, किंवा लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत, त्यांना बोलणारे समुदाय देखील लुप्त होत चालले आहेत. भारतीय भाषांना शिकविण्यासाठी इंग्रजी का माध्यम बनावी, जर संस्कृत, गुजराती किंवा सिंधी शिकायची असेल तर कोणत्याही भारतीय भाषेत ती का शिकविली जात नाही. यामुळे मातृभाषांचे संरक्षण होईल असे मत डॉ. मीणा यांनी मांडले.

21 फेब्रुवारीला मातृभाषा दिन

हिंदीसोबत जुळल्याने इतर भाषा समृद्ध झाल्या आहेत. जगात संस्कृती आणि भाषिक विविधता तसेच बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी 21 फेब्रुवारी रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा केला जातो. याची पहिली घोषणा 17 नोव्हेंबर 1999 रोजी युनेस्कोद्वारे करण्यात आली. संयुक्त राष्ट्र महासभेद्वारे औपचारिक रुपाने प्रस्ताव संमत करत 2008 साली याला मान्यता देण्यात आली.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹सौर ऊर्जा निर्मिती दुप्पट करणार

सौर पार्क आणि अन्य क्षेत्राची क्षमता दुप्पट करत 40 हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती करण्यासाठी सरकारने मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आर्थिक विषयांच्या समितीने सौर पार्कच्या विकासासाठी आणि मोठय़ा प्रकल्पातून ऊर्जा निर्मिती करण्याची क्षमता दुप्पट करण्याचा निर्णय घेतला.

सध्या या क्षेत्रातून 20 हजार मेगावॅट ऊर्जेची निर्मिती करण्यात येत आहे. ही क्षमता दुप्पट करत 40 हजार मेगावॅट करण्यात येणार आहे. 500 मेगावॅटपेक्षा अधिक क्षमतेच्या कमीत कमी 50 सौर पार्कची स्थापना करण्यात येणार आहे. या योजनेनुसार हिमालय आणि अन्य डोंगराळ भागात सौर ऊर्जा निर्मिती करण्यावर भर देण्यात येणार आहे. नागरी वस्तूपासून हा भाग दूर असल्याने उपकरणे पोहोचविणे या ठिकाणी कठीण असते.

राज्यांनी सौर पार्कसाठी मागणी केल्याने सौर पार्क योजनांची क्षमता वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने 8,100 कोटी रुपये वित्तीय समर्थन देण्याबरोबरच मोठे प्रकल्प उभारण्यासाठी 2019-20 पर्यंत समितीची स्थापना करण्यात येणार आहे. देशातील हा प्रकल्प कार्यरत झाल्यानंतर 64 अब्ज यूनिट वीज प्रतिवर्षी निर्माण करण्यात येणार आहे. यामुळे प्रतिवर्षी साधारण 5.5 कोटी टन सीओ2च्या उत्सर्जनात कमी येईल.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹‘टाटा’ प्रमुखपदी चंद्रशेखरन विराजमान

टीसीएस प्रमुखपदी राजेश गोपीनाथन : दोघांचेही कर्मचाऱयांना पत्र

सात लाख कोटी रुपयांच्या टाटा समुहाच्या अध्यक्षपदी एन. चंद्रशेखरन हे मंगळवारी विराजमान झाले. भविष्यात समुहातील कंपन्यांच्या प्रमुखांबरोबर माईंडसेटने काम करणार आणि समभागधारकांना चांगला परतावा देण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर म्हटले. यापूर्वी घेण्यात आलेल्या संचालकांच्या बैठकीत रतन टाटा यांनी चंद्रशेखरन यांचे स्वागत केले.

टाटा समुहाच्या 150 वर्षांच्या परंपरेची जबाबदारी स्वीकारणे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. टाटा परिवाराचा हिस्सा बनल्याने आपल्याला गौरव वाटत आहे. केवळ व्यवसाय म्हणून समाजात काम करण्यापेक्षा समाजावर परिणाम होईल अशी कामगिरी करण्याचा आपला प्रयत्न राहील, असे त्यांनी कर्मचाऱयांना लिहिलेल्या पत्रात म्हटले.

चंद्रशेखरन यांची टाटा समुहाच्या अध्यक्षपदी वर्णी लागल्याने रिक्त झालेल्या पदाची जबाबदारी राजेश गोपीनाथन यांनी स्वीकारली. पदाची जबाबदारी स्वीकारताच त्यांनी आपल्या कर्मचाऱयांना पत्र लिहिले. यामध्ये ग्राहकांच्या आवश्यकतेवर भर देण्याचा प्रयत्न आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने व्यवसाय बदलण्यावर आपला भर राहणार आहे, असे त्यांनी म्हटले.

राजेश गोपीनाथन टीसीएसमध्ये 2001 मध्ये दाखल झाले. आयआयएम अहमदाबादचे माजी विद्यार्थी असणारे गोपीनाथन यापूर्वी टाटा समुहाच्या टीसीएसमध्ये प्रमुख आर्थिक सल्लागार पदावर कार्यरत होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹सरकारकडून मिळणार मोफत ऍन्टी-व्हायरस

हॅकर आणि सायबर गुन्हय़ांपासून नागरिकांच्या लॅपटॉप आणि संगणकाची सुरक्षा करण्यासाठी सरकारकडून मोफत ऍन्टी-व्हायरस देण्यात येणार आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशकर प्रसाद यांनी या उपक्रमाची सुरुवात बॉटनेक क्लिनिंग ऍन्ड मालवेअर ऍनालिसिस सेंन्टरमध्ये केली असून स्मार्टफोनधारकांनाही याचा लाभ घेता येईल. ‘सायबर स्वच्छता केंद्र’ या नावाने हा उपक्रम सुरू करण्यात आला असून लवकरच नागरिकांना मोफत ऍन्टी-व्हायरस डाऊनलोड करता येणार आहे. या उपक्रमासाठी सरकारला 90 कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. पुढील पाच वर्षांसाठी ही सेवा देण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षात वाढत्या सायबर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹फ्लिपकार्ट-मायक्रोसॉफ्टची धोरणात्मक भागीदारी

मायक्रोसॉफ्टने फ्लिपकार्टबरोबर ‘धोरणात्मक भागीदारी’ करण्यात आल्याचे सोमवारी घोषित केले. यानुसार फ्लिपकार्ट मायक्रोसॉफ्टच्या एक्सक्लूसिव्ह पब्लिक क्लाऊड प्लॅटफॉर्म मायक्रोसॉफ्ट अझुरचा वापर करणार आहे. देशातील ग्राहकांना सर्वोत्तम ऑनलाईन खरेदी सेवा देण्यासाठी ही भागीदारी करण्यात आली. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला आणि फ्लिपकार्ट समूह सीईओ बिन्नी बन्सल यांनी एका कार्यक्रमादरम्यान ही घोषणा केली.

फ्लिपकार्टबरोबर भागीदारी करताना आपल्याला आनंद होत आहे. फ्लिपकार्टने गेल्या काही वर्षात ऑनलाईन शॉपिंग क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे. याचबरोबर पेमेन्ट आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातही उत्तम प्रकारे कार्यरत आहे. भारतातील मायक्रोसॉफ्टचा व्यवसाय वाढत आहे. भारतात इंटनरेनचा वेगाने विस्तार होत आहे. आता डेटा ही एक प्रकारे नैसर्गिक संपत्ती बनली आहे. यामुळे नवीन वस्तूंच्या बाबतीत विचार करणे गरजेचे आहे, असे त्यांनी म्हटले. बेंगळूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या डिजिटल ट्रान्सफर्मेशन, इंटेलिजन्ट क्लाऊड ऍन्ड आर्टिफिशियल इन्टलिजन्स वर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते.

मायक्रोसॉफ्टबरोबरच्या या भागिदारीमुळे आम्ही तंत्रज्ञान, ई-व्यापार आणि बाजार क्षेत्रातील माहिती आणि ताकदीचा योग्य प्रकारे वापर करू शकणार आहोत. यामुळे ग्राहकांना ऑनलाईन शॉपिंग करण्याचा अधिक चांगला अनुभव घेता येईल. फ्लिपकार्ट या क्षेत्रात गेल्या 10 वर्षांपासून आहे. कंपनीजवळ सध्या 5 कोटी ग्राहक आहे. आगामी 10 वर्षात ही संख्या 50 कोटीवर कशा प्रकारे नेण्यात येईल याचा विचार सध्या सुरू आहे, असे बिन्नी बन्सल म्हणाले.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹महाराष्ट्र सरकारकडून कामगार कायद्यात सुधारणा

राज्यातील लहान व्यावसायिकांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र सरकारने राज्याच्या कामगार कायद्यात सुधारणा केली आहे. राज्यातील लहान व्यावसायिकांकडे आता 50 कामगार असतील, तर त्यांना कामगार कायद्यातून बाहेर ठेवण्यात येणार आहे. यापूर्वी ही संख्यरा 20 होती. मात्र या निर्णयामुळे कर्मचाऱयांच्या शोषणात वाढ होणार असल्याने कामगार संघटना विरोध करण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय लहान व्यावसायिकांसाठी अनुकूल आहे. सरकारी लालफितीबाहेर काम करत ते आता 50 कामगार ठेऊ शकतात. सरकारच्या नव्या सुधारणामुळे कपन्यांना आता 50 कर्मचाऱयांपर्यंत कामगार कायदा 1970 चे पालन करणे जरुरी भासणार नाही. कंपन्यांनी कामगारांना प्रॉव्हिडेंड फंड, वेळेनुसार वेतन, कार्यालयात कॅन्टीन, विश्रांतीगृह आणि साप्ताहिक सुटी यासारख्या सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत तरी सरकारकडून जाब विचारण्यात येणार नाही. यापूर्वी कार्यालयात कर्मचारी संख्या 20 पेक्षा जास्त असल्यास कंपनी कामगार कायद्याखाली येत होते. मात्र आता 50 कर्मचाऱयांपर्यंत कंपनीला सरकारकडून सूट मिळणार आहे.

लहान व्यावसायिक सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करतील. मात्र नवीन कायद्याच्या नावाखाली कर्मचाऱयांचे शोषण होण्याची शक्यता कामगार संघटनांनी वर्तविली आहे. भविष्यात क्यावसायिकांनी कर्मचाऱयांना चांगल्या सुविधा पुरविल्यास त्यांचे आरोग्य सुरक्षित राहील, अन्यथा त्यांना मिळणाऱया सुविधा हटविण्यात आल्याने त्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. राज्यात भाजप-शिवसेना सरकार सत्तेत आल्यावर 2 वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. मात्र रोजगारनिर्मिती आवश्यक त्या प्रमाणात वाढलेली नाही. राज्य सरकार रोजगारनिर्मितीसाठी प्रयत्नशील आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹शास्त्रज्ञांनी शोधल्या बेडकाच्या सात नव्या प्रजाती

भारतीय शास्त्रज्ञांनी पाच वर्षांच्या अथक शोधानंतर छोट्या बेडकाच्या सात नव्या प्रजातींचा शोध लावला आहे. हे बेडूक आकाराने एवढे छोटे आहेत की, लहान मुलाच्या अंगठ्याच्या नखावरही मावू शकतात. गुप्त अधिवास आणि किड्यांसारखा आवाज यामुळे त्यांच्याकडे यापूर्वी दुर्लक्ष झाले होते, असे दिल्ली विद्यापीठातील दोन संशोधकांनी केलेल्या अभ्यासात म्हटले आहे. या अभ्यासाचे नेतृत्व करणारे प्रोफेसर एस. डी. बिजू यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, हे बेडूक छोट्या भौगोलिक प्रदेशातील असल्यामुळे संशोधनाचे निष्कर्ष अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. वाघ आणि हत्ती यासारख्या मोठ्या प्राण्यांसह या छोट्या उभयचर जीवांचे संरक्षणही गरजेचे आहे. पश्चिम घाटातील बेडकांपैकी एकतृतीयांश प्रजाती विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. नव्या सात प्रजातींपैकी पाच प्रजातींही धोक्यात असून त्यांचे तातडीने जतन करण्याची गरज आहे. या प्रजाती बेडकांच्या इतर प्रजातींहून भिन्न आहेत. इतर बेडूक केवळ रात्री सक्रिय असतात; परंतु या प्रजातींचे बेडूक दिवसा तद्वतच रात्रीही सक्रिय असतात. नव्या सात प्रजातींपैकी चार प्रजाती १२.२ ते १५.४ मिलिमीटर एवढ्या लांबीच्या आहेत, असे ते म्हणाले.

या जंगलात मोठ्या संख्येने हे बेडूक आढळून येतात. आकाराने खूपच लहान असल्यामुळेच कदाचित कोणाचे आतापर्यंत त्यांच्याकडे लक्ष गेले नसावे. हे बेडूक मोठ्या संख्येने आहेत. तथापि, त्यांचे भवितव्य अंधकारमय आहे. हे बेडूक वेगवेगळ्या नाही तर एकाच भागात दिसून आले. अनेक बेडूक तर त्यांच्या अधिवासापासून दूर शेतात आणि बागांमध्ये आढळून आले. मानवी वावर असल्यामुळे या जागा त्यांच्यासाठी असुरक्षित ठरू शकतात. दिल्ली विद्यापीठाच्या सोनाली गर्ग यांनी सांगितले की, हे बेडूक जमिनीवर राहतात आणि रात्री रातकिडे, तसेच पतंगांसारखा आवाज काढतात. नव्या जीवांचा शोध घेणाऱ्या शास्त्रज्ञांच्या पथकात सोनाली यांचा समावेश आहे. निशाचर बेडकांचा गट निक्टिबाट्रेचस या नावाने ओळखला जातो. या गटात आधीच २८ मान्यताप्राप्त प्रजाती आहेत. त्यातील केवळ तीन प्रजातींचा आकार १८ मि.मी.हून कमी आहे. आता या गटातील ज्ञात प्रजातींची संख्या वाढून ३५ झाली आहे. पश्चिम घाटात आढळणारी ही प्रजाती ७-८ कोटी वर्षे जुनी आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या समांतर असलेल्या पर्वतराजीत शेकडोंच्या संख्येने दुर्मिळ प्रजातींच्या वनस्पती आणि जीवजंतू आहेत; परंतु त्यांचे अस्तित्व धोक्यात आहे.

संशोधक दीर्घ काळापासून पश्चिम घाटाजवळील जंगलात संशोधन करीत होते. मागील पाच वर्षांच्या संशोधनानंतर त्यांना या जंगलात बेडकाच्या नव्या प्रजातींचा शोध लागला. जैव विविधतेच्या दृष्टिकोनातून हा परिसर अत्यंत संपन्न समजला जातो. जैव विविधतेबाबत बोलायचे झाल्यास पश्चिम घाटातील या जंगलाची तुलना अमेझॉनशी केली जाते. २००६ पासून आतापर्यंत येथे उभयचर प्राण्यांच्या १०० हून अधिक नव्या प्रजाती आढळून आल्या आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹पहिल्या कसोटीतच भारताने मोडला पाकचा वर्ल्ड रेकॉर्ड

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यास पुण्याच्या गहुंजे स्टेडियममध्ये आज सुरूवात झाली. यासोबत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं गहुंजे स्टेडियम भारतातली 25 वं टेस्ट सेंटर बनलं. या सामन्याला सुरूवात होताच भारताने पाकिस्तानचा विक्रम मोडला.

काय आहे हा विक्रम-
आतापर्यंत सर्वात जास्त मैदानावर कसोटी खेळण्याचा विश्वविक्रम पाकिस्तानच्या नावावर होता. त्यांनी 79 मैदानांवर कसोटी सामने खेळले आहेत. तर गहुंजे स्टेडियमवर सुरू असलेला सामना हा भारताचा 80 व्या मैदानावरील सामना ठरला त्यामुळे भारताने पाकिस्तानचा विश्वविक्रम तोडला.

आतापर्यंत कोणत्या संघाने किती मैदानांवर सामने खेळले-
 -80 भारत
-79 पाकिस्तान
-74 न्यूझीलंड, वेस्टइंडीज
-72 श्रीलंका
-71 इंग्लैंड
-70 ऑस्ट्रेलिया
-62 द. अफ्रीका
-36 झिम्बाब्वे
-35 बांगलादेश

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹नेपाळमध्ये अरुण-३ जल-विद्युत प्रकल्पाच्या उत्पादन घटकासाठी गुंतवणूक प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय समितीने नेपाळमध्ये अरुण-३ जल-विद्युत प्रकल्पाच्या (९०० मेगावॅट) उत्पादन घटकासाठी ५७२३.७२ कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चाच्या गुंतवणूक प्रस्तावाला मंजुरी दिली. सप्टेंबर २०२२ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे.

पूर्व नेपाळमधील संकुवसभा जिल्ह्यात अरुण नदीवर हा प्रकल्प आहे.

या प्रकल्पामुळे भारताला अतिरिक्त वीज उपलब्ध होईल, आणि नेपाळबरोबरचे आर्थिक संबंध दृढ होतील.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹सौर पार्क आणि मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पांच्या विकासासाठी सौर ऊर्जा क्षमता २० हजारांवरून ४० हजार मेगावॅट पर्यंत वाढवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय समितीने सौर पार्क आणि मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पांच्या विकासासाठी सौर ऊर्जा क्षमता २० हजारांवरून ४० हजार मेगावॅटपर्यंत वाढवायला आज मंजुरी दिली. वाढीव क्षमतेमुळे देशाच्या विविध भागात ५०० आणि त्याहून अधिक मेगावॅट क्षमतेचे किमान ५० सौर पार्क उभारता येतील.

केंद्र सरकारच्या ८१०० कोटी रुपयांच्या सहाय्याने २०१९-२० पर्यंत सौर पार्क आणि मोठे सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जातील. यातून दरवर्षी ६४ अब्ज युनिट वीज निर्मिती होईल.

यामुळे वर्षाला अंदाजे ५५ दशलक्ष टन कार्बन उत्सर्जन कमी व्हायला मदत होईल. यामुळे देशाच्या दीर्घकालीन सौर ऊर्जा सुरक्षेत योगदान मिळेल. तसेच आजूबाजूच्या परिसराचा विकास होईल.
राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने सौर पार्क विकसित केले जाणार आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹नवी दिल्ली येथे होमिओपॅथी औषधांचे
नियमन यावर वर्ल्ड इंटीग्रटेड मेडिसिन फोरम
आयोजित

23 फेब्रुवारी 2017 रोजी नवी दिल्ली येथे आयुर्वेद, योग आणि प्राकृतिक चिकित्सा, युनानी, आणि होमिओपॅथी (AYUSH) राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) श्रीपाद येस्सो नाईक यांच्या हस्ते ‘वर्ल्ड इंटीग्रटेड मेडिसिन फोरम ऑन रेग्युलेशन ऑफ होमिओपॅथी मेडिसिनल प्रॉडक्ट्स:नॅशनल अँड ग्लोबल स्ट्रॅटजीज’ या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले आहे. हा दोन दिवसीय कार्यक्रम AYUSH मंत्रालय आणि केंद्रीय होमिओपॅथी संशोधन परिषद (CCRH) कडून आयोजित करण्यात आला होता.

हे फोरम या प्रकारचे एकमेव आहे, जे भारतीय होमिओपॅथी औषधी उद्योगामध्ये प्रगती साधण्यासाठी एक प्रमुख खेळाडू म्हणून भारताकडे पाहत आहे. या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात होमिओपॅथी औषधी उद्योगामध्ये कार्य करण्याजोगे पैलूंचे धोरण ठरविण्यासाठी आयोजित केले गेले आहे.

याप्रसंगी, होमिओपॅथी औषधांच्या क्षेत्रात होमिओपॅथी फार्माकोपोइया कन्व्हेंशन ऑफ द यूनायटेड स्टेट्स (HPCUS) आणि भारताच्या दोन मंडळ – भारतीय औषधी व होमिओपॅथी औषधीकोश आयोग (Pharmacopoeia Commission for Indian Medicine & Homoeopathy -PCIM&H) व केंद्रीय होमिओपॅथी संशोधन परिषद (CCRH) यांच्यात सहकार्य करार झाला.

भारतात, होमिओपॅथी औषधे औषध व प्रसाधन सामग्री अधिनियम व नियम यांतर्गत नियंत्रित केले जाते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹G-20 राष्ट्रांमध्ये भारत ही सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असणार: मूडीज अहवाल

मूल्यांकन करणारी आंतरराष्ट्रीय संस्था ‘मूडीज इंवेस्टर सर्विस’ यांच्या ‘मॉडेस्ट एस्सेलिरेशन इन द ग्लोबल इकॉनमी’ अहवालानुसार, G-20 राष्ट्रांमध्ये भारत ही सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असणार आहे, ज्याचा वर्ष 2017 मध्ये 7.1% वृद्धीदर असेल.

अहवालानुसार, G-20 देशांमध्ये वृद्धीसह जागतिक आर्थिक उपक्रमांमध्ये वर्ष 2016 मधील 2.6% पासून ते वर्ष 2017 आणि 2018 मध्ये 3% ने नियमित वाढ करत चक्रीय पुनर्प्राप्तीला स्थैर्य प्राप्त होईल.

आशियामध्ये, चीनची अर्थव्यवस्था वर्ष 2016 मध्ये 6.7% इतकी अधिकृत लक्ष्यित वाढ दिसून आलेली आहे, मात्र ती वर्ष 2017 मध्ये घसरून 6.3% आणि वर्ष 2018 मध्ये 6% इतकी राहणे अपेक्षित आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ केनेथ जे. अॅरो यांचे निधन

सर्वाधिक तरुण वयातच नोबेल पारितोषिक पटकावणारे अमेरिकेचे अर्थशास्त्र केनेथ जे. अॅरो यांचे पालो अल्टो, सॅन फ्रान्सिस्को बे एरिया येथे निधन झाले आहे. ते 95 वर्षांचे होते.

अॅरो यांनी त्यांच्या अभ्यासातून मतदान पासून ते आरोग्य विमा ते उच्च गुंतवणूक अश्या सर्व महत्त्वपूर्ण विषयांवर बाजारपेठेचे अनुषंगाने असलेले धोके, अभिनव कल्पना आणि मूलभूत गणित यावरील सिद्धांत विचारपूर्वक मांडलेले आहे.

अॅरो आणि ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ सर जॉन आर. हिक्स यांना त्यांच्या ‘सर्वसाधारण इक्विलिब्रियम थेयरी’ या अकल्पित गणिती कामासाठी इकनॉमिक सायन्स या श्रेणीमध्ये 1972 सालीचा नोबेल पारितोषिक देण्यात आला होता. शिवाय अॅरो यांनी 1951 साली ‘सोशल चॉइस अँड इंडिविज्युयल वॅल्यूज’ हे पुस्तक देखील लिहिलेले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹हसन अली खैरे बनले सोमालियाचे नवे पंतप्रधान

सोमालियाचे नवे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद अब्दुल्लाही फार्मजो यांनी देशाचे पुढील पंतप्रधान म्हणून हसन अली खैरे यांचे नामांकन दिले आहे. खैरे यांनी ब्रिटिश ऊर्जा कंपनी ‘सोमा ऑइल अँड गॅस’ कंपनीचे आफ्रिका संचालक म्हणून अडीच वर्षे कार्य केलेले आहे. वर्ष 2011-2014 दरम्यान ते नॉर्वेजियन निर्वासित परिषदेसाठी हॉर्न ऑफ आफ्रिका संचालक होते.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹देशात पहिल्यांदाच होणार हींगची शेती

प्रत्येक भाजीत थोड्या मात्रात वापरण्यात येणार्या हींगचा वापर भारतात सर्वाधिक प्रमाणात केला जातो. जगभरात उत्पन्न होणार्या एकूण हींगच्या 40 टक्के वापर भारतात केला जातो. मसालांच्या पदार्थापासून औषधासाठी हींगचा वापर केला जातो. विशेष म्हणजे, भारतात हींगचे उत्पादन घेतले जात नाही.

भारताला हींगची आयात करण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे विदेशी चलन खर्ची करावे लागते. तरीही कोणत्याही सरकारने किंवा कृषी विद्यापीठांनी हींगाचे उत्पन्न घेण्यासाठी प्रयत्न केलेले दिसत नाही. या परिस्थितीत बदल करण्यासाठी आणि भारतातील शेतकर्यांना नवीन उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्यासाठी इंडियन कॉफी बोर्डचे सदस्य डॉ. विक्रम शर्मा यांचा अभ्यास सुरू आहे. यासाठी डॉ. शर्मा यांना सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळत नसून ते स्वत:च त्यासाठी प्रयत्नशील आहेत.

विक्रम यांनी हींग शेती करण्याचा निश्चय केला असून त्यासाठी त्यांनी इराणमधून हींगचे बी मागविले आहे. हिमाचल प्रदेशातील बिलासपुर येथील डोंगराळ भागात त्यांनी हींगची शेती करण्यास सुरूवात केली आहे. तसेच त्यांनी राज्यातील सोलन, लाहौल-स्फीति, सिरमौर, कुल्लू, मंडी आणि चंबा येथेही हींगची शेती करू इच्छित आहेत. डॉ. शर्मा म्हणाले, मी उत्तराखंड, जम्मू-काश्मीर आणि नेपाळलगत असलेल्या प्रदेशात हींगची शेती करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

काय आहेत अडचणी?
हींगची शेती करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची बी मिळविणे खूप कठीण काम आहे. जगभरात हींगची शेती मुख्यता। अफगानिस्तान, इराण, इराक, तुर्कमेनिस्तान आणि बलूचिस्तान येथे होते. या देशांमध्ये हींगचे बी अन्य देशांना विकल्यास मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येते. डॉ. शर्मा म्हणाले की, त्यांनी संशोधन करण्यासाठी मोठ्या परिश्रमानंतर हींगचे बी इराणवरून मागविले आहे. यातून देशातील विविध भागात हिंगची शेती करण्यास सुरूवात करण्यात येईल.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹टेलिनॉर होणार भारती एअरटेलमध्ये विलिन

 नॉर्वेची टेलिकॉम कंपनी टेलिनॉर आपला भारतातील कारभार गुंडाळणार असून त्यांचा भारतातील व्यवसाय आघाडीची मोबाईल कंपनी भारती एअरटेल ताब्यात घेणार आहे. या विलिनीकरणाच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या असून हा व्यवहार नेमका किती रकमेचा आहे; हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.

टेलिनॉर इंडियाचा देशातील उत्तरप्रदेश (पूर्व व पश्चिम), गुजरात, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, बिहार आणि आसाम या ७ टेलिकॉम परिमंडळामध्ये विस्तार असून कंपनीचे दि. ३१ डिसेंबरच्या आकडेवारीनुसार एकूण ५ कोटी ग्राहक आहेत. या विलिनीकरणामुळे एअरटेलच्या १८०० मेगाहर्टझमध्ये टेलिनॉरच्या ४३.४ मेगाहर्टझ स्पेक्ट्रमची भर पडणार आहे. त्यामुळे कंपनीला अधिक प्रभावीपणे ४ जी सुविधा देणे शक्य होणार असून रिलायन्स जिओबरोबर स्पर्धा करण्यासाठी ते महत्वाचे आहे.

या विलिनीकरणानंतर एअरटेलचा देशातील मोबाईल सेवा बाजारपेठेतील वाटा ८ टक्क्यांनी वाढणार आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹दूध पिण्याच्या बाबतीत चीनपेक्षा भारतच पुढे!

वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये चीनने भारताला मागे टाकले असले, तरी एका बाबतीत चीन मागे ठरला आहे. चीनमध्ये दरडोई दूध पिण्याचे प्रमाण हे भारताच्या तुलनेत अर्ध्यापेक्षाही कमी आहे, अशी माहिती एका चीनी संघटनेने दिली आहे.

चीनी डेयरी एसोसिएशनने मंगळवारी या संबंधातील आकडेवारी जाहीर केली. त्यात म्हटले आहे, की 2016 या वर्षी चीनमध्ये दरडोई दूध पिण्याचे प्रमाण 36.3 किलोग्रॅम एवढे होते. जगाच्या सरासरीपेक्षा हे एक तृतीयांश किंवा भारताच्या तुलनेत हे अर्ध्यापेक्षा कमी होते.
चीनी लोकांच्या शरीरात सर्वसामान्यपणे कॅल्शियमचे प्रमाण कमी असते. दररोज 300 मिलीलीटर दूध प्यायल्यास आवश्यक कॅल्शियमपैकी एक तृतीयांश भागाची गरज पूर्ण होऊ शकते.

चीनने या संबंधात 1988 साली चीनी लोकांसाठी आहाराच्या मार्गदर्शक सूचना प्रकाशित केल्या होत्या. त्यात दूध पिण्याचा सल्ला चीनी नागरिकांना देण्यात आला होता. मात्र 30 वर्षांनंतरही याबाबत फारशी प्रगती झाली नाही, असे या संघटनेने म्हटले आहे.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹देशातले पहिले हेलिपॉड दिल्लीत

देशातले पहिले हेलिपॉड दिल्लीच्या रोहिणी भागात तयार झाले असून त्याचे उद्घाटन २८ फेब्रुवारीला होणार आहे. या हेलिपॉडवरून दिल्लीच्या आसपासच्या भाग तसेच देशातील अन्य कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी हेलिकॉप्टर बुक करता येणार आहे. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या टर्मिनल बिल्डींगमध्ये १५० प्रवासी बसू शकतात, येथे चार हँगर्सही उभारले गेले असून तेथे १६ हेलिकॉप्टर उभी करता येतात. त्यासाठी नऊ पार्किंग वे आहेत.

अॅव्हीएशन विभागाचे सचिव आर.एन.चौबे या संदर्भात माहिती देताना म्हणाले की हा १०० कोटी रूपयांचा प्रकल्प असून या प्रकल्पाची मालकी पवनहंस हेलिकॉप्टर कडे आहे. ही दक्षिण आशियातली सर्वात मोठी हेलिकॉप्टर कंपनी असून त्यांच्या ताफ्यात ५० हेलिकॉप्टर्स आहेत. ही कंपनी भारत सरकारच्या आधीन आहे. हेलिपॉड सुविधेमुळे हेलिकॉप्टर प्रवास सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणार आहे. या सेवेने देशातील महत्त्वाची सर्व ठिकाणे जोडली जाणार असून प्रथम टप्प्यात दिल्ली, सिमला, हरिद्वार, डेहराडून, मथुरा, आग्रा, मेरठ व मणेसर ही शहरे जोडली जाणार आहेत.

#eMPSCkatta_Current_Affairs

🔹लंडनची सुरक्षा प्रथमच महिलेच्या हाती

लंडनच्या नव्या मेट्रोपोलिटिन कमिशनर म्हणून क्रेडिसा डिक यांची नियुक्ती केली गेली असून लंडन पेालिसांचे नेतृत्त्व करणारी त्या पहिल्या महिला पोलिस अधिकारी ठरल्या आहेत. सर बनॉर्ड होगन यांच्या जागेवर आता डिक काम करणार आहेत. या नेमणुकीने मोठी जबाबदारी सोपविली गेली आहे व त्याचबरोबर एक चांगली संधीही मिळाली असल्याची भावना क्रेडिसा यांनी व्यक्त केली आहे.

यापूर्वी क्रेडिसा यांनी दहशतवाद विरोधी राष्ट्रीय पोलिस दलाचे नेतृत्त्व केले आहे. विदेशी विभागात काम करण्यासाठी त्यांनी मेट्रोपोलिटन विभाग सोडला होता.५६ वर्षीय क्रेडिसा यांनी या विभागात ३१ वर्षे काम केले आहे. डिसेंबर २०१४ मध्ये त्या दहशतवाद विरोधी विभागात दाखल झाल्या होत्या. क्रेडिसा यांची नवी नेमणूक वादविवादातूनच झाली आहे कारण २००५ साली लंडन बाँबस्फोटांचा तपास करताना ब्राझील येथील निरपराध नागरिकाला पोलिसांनी गोळी घालून ठार केले होते त्या पथकाचे नेतृत्त्व क्रेडिसा यांच्याकडे होते. मात्र त्या घटनेचा आरोप क्रेडिसा यांच्यावर नव्हता.

क्रेडिसा यांच्या नेमणुकीबद्दल गृहसचिव अंबेर रूड म्हणाले, क्रेडिसा स्पष्ट विचारांची व सक्षम अधिकारी आहे. तिच्या हाती लंडनच्या नागरिकांची सुरक्षा सोपविली गेली आहे व ही जबाबदारी ती नक्कीच चांगली पार पाडेल. क्रेडिसाला या पोस्टसाठी सव्वा दोन कोटी रूपये पगार दिला जाणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा